सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील पाकिस्तानी संघाची धुरा बाबर आझमच्या हाती देण्यात आलेली आहे. बाबर आझमदेखील कर्णधारपदाच्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत आहे. बाबर सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या झटपट धावा काढण्याच्या कौशल्यामुळे त्याची तुलना नेहमीच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी केली जाते. पण, विराट सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. अशा परिस्थितीमध्ये विराट कोहली आणि बाबर आझमपैकी कोण चांगला फलंदाज आहे? हा प्रश्न दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या क्रमवारीत बाबरने टी २० फलंदाजी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. असे करून त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडीत काढला आहे. कोहली १०१३ दिवस टी २० क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. बाबरने विराटचा हा विक्रम मोडला आहे. हेही वाचा - IND vs ENG Edgbaston Test : ‘ये रे ये रे पावसा…’, भारतीय चाहत्यांनी सुरू केली प्रार्थना कोहलीला मागे टाकल्यानंतर बाबरला याबाबत प्रश्न विचारले जाणे स्वाभाविक आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराला श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आले. "तू अलीकडेच विराट कोहलीचा विक्रम मोडला आहेस…," असे वाक्य उच्चारताच बाबरने पत्रकाराला थांबवून "कौन सा (कोणता)?," असा प्रतिप्रश्न केला. या प्रतिप्रश्नातून, गेल्या काही महिन्यांमध्ये आपण सातत्याने विराटपेक्षा सरस कामगिरी केली आहे, असे बाबरने अप्रत्यक्षपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.