R Ashwin On Arshdeep Singh: डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा भारतीय टी-२० संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. अर्शदीप सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ६३ सामन्यांमध्ये ९९ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. अर्शदीपला आशिया चषकासाठी भारतीय टी-२० संघात स्थान देण्यात आलं आहे. यूएईविरूद्ध पार पडलेल्या सामन्यात १ गडी बाद करताच त्याच्याकडे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठण्याची संधी होती. पण, या सामन्यात त्याला संधी दिली गेली नाही. यावरून आता अश्विनने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
या सामन्यातून अर्शदीप सिंगला बाहेर ठेवणं हे माजी खेळाडू अश्विनला पटलेलं नाही. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना त्याने अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनने गंभीरवर जोरदार टीका करत म्हटले की, गंभीरच्या प्रशिक्षणाखाली अर्शदीपला संधी न मिळणं हा आता ट्रेंड बनत चालला आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आर अश्विन म्हणाला, “अर्शदीपला वगळण्यात आलं, हे आश्चर्यचकीत करणारं आहे, पण यात काही नवीन नाही. जेव्हापासून गंभीरने प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली आहे, तेव्हापासून हेच घडत आहे. अर्शदीप सिंग चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने खेळू शकला नव्हता. कदाचित दुबईतील परिस्थिती पाहता, ते फिरकी गोलंदाजांना अधिक प्राधान्य देत आहेत. गंभीरने केकेआरसाठी जेतेपद जिंकलं होतं, त्यावेळीही त्याने फिरकी गोलंदाजीवर अधिक भर दिला होता.
अर्शदीप सिंग नवीन चेंडूने गोलंदाजी करताना विकेट्स काढून देण्यासाठी ओळखला जातो. पण २०२५ मध्ये त्याला फार क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. यावर्षी त्याला भारतीय संघासाठी केवळ १ मालिका खेळण्याची संधी मिळाली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडविरूद्ध झालेल्या ३ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ४ आणि एका वनडे सामन्यात त्याने २ गडी बाद केले होते. त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. पण हर्षित राणा आणि मोहम्मद शमी बुमराहच्या जोडीला असल्यामुळे त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यासाठीही भारतीय संघात संधी दिली गेली होती. मात्र ५ सामन्यांपैकी एकही सामन्यात त्याला संधी दिली गेली नव्हती. अर्शदीप सिंग पहिल्या सामन्यापासून संघाचा भाग होता. पण मुख्य गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर, त्यांनी अंशुल कंबोजला बोलवून खेळवलं पण अर्शदीपला संधी दिली नव्हती.