Ranji Trophy Quarter Final 2024 Updates : रणजी करंडक २०२३-२४ स्पर्धेतील तिसरा उपांत्यपूर्व फेरीच्या सामना मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्यात सोमवारी पार पडला. या रोमांचक मध्य प्रदेशने आंध्रचा ४ धावांनी पराभव करत सलग तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आंध्रचा संघ एकेकाळी मजबूत स्थितीत होता. दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा त्यांची धावसंख्या ९५/४ होती. त्यावेळी क्रीजवर अनुभवी हनुमा विहारी होता. यानंतर अनुभव अग्रवालने शानदार गोलंदाजी करत सामना आपल्या बाजूला झुकवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या डावात तीन बळी घेणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने सोमवारी सकाळी होळकर स्टेडियमवर ५२ धावांत ६ बळी घेत आंध्रच्या आशा धुळीस मिळवल्या. स्टंप-टू-स्टंप गोलंदाजी करताना अनुभवने पहिल्यांदा करण शिंदेला बाद केले. यानंतर त्याने अर्धशतक झळकावणाऱ्या विहारीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या डावात २३४ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात आंध्र प्रदेशने १७२ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात १०७ धावा केल्या आणि आंध्राला १७० धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात संघ १६५ धावांवर गारद झाला.

हनुमा विहारी मध्य प्रदेशच्या जाळ्यात अडकला –

मध्य प्रदेशने विहारीची विकेट घेण्यासाठी एक जाळे टाकले होते, ज्यात विहारी अडकला. अनुभवच्या षटकाच्या आधी, कुलवंत खेजरोलियाने बाउन्सर आणि शॉर्ट चेंडूने विहारीला त्रास दिला. मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या म्हणण्यानुसार, ‘विहारीचे लक्ष वळवण्यासाठी’ हे केले गेले. अशा प्रकारे मध्य प्रदेशन विहारीला आपल्या जाळ्यात अडकवले.हनुमा विहारी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर आंध्रने झटपट विकेट गमावल्या. अनुभव आतापर्यंत या हंगामात सर्वश्रेष्ट प्रदर्शन करताना २४ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Hanuma Vihari : खळबळजनक! भारतीय क्रिकेटपटूला नेत्याच्या मुलावर ओरडणं पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा

मुंबईकडे ४१५ धावांची आघाडी –

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई आणि बडोदा आमनेसामने आहेत. यामध्ये हार्दिक तामोरेचे शतक (११४) आणि पृथ्वी शॉच्या अर्धशतकाच्या (८७) बळावर मुंबईने दुसऱ्या डावात ९ गडी गमावून ३७९ धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईची एकूण आघाडी ४१५ धावांची झाली आहे. सध्या तनुष कोटियन (३२) आणि तुषार देशपांडे (२३) क्रीजवर आहेत. हा सामना शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिल्यास मुंबई उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : “त्याने दबावात संयम दाखवला आणि…”, मालिका विजयानंतर रोहितकडून ध्रुव जुरेलचे कौतुक

कर्नाटकला विजयासाठी शेवटच्या दिवशी २६८ धावांची गरज –

पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकने विजयासाठी ३७१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना १ बाद १०३ धावा केल्या आहेत.सध्या मयंक अग्रवाल (६१) आणि अनीस केव्ही (१) क्रीजवर आहेत. कर्नाटककडून आर समर्थ (४०) हा एकमेव फलंदाज बाद झाला. विदर्भाला विजयासाठी ९ विकेट्सची गरज आहे, तर कर्नाटकला शेवटच्या दिवशी २६८ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy quarter final 2024 4th day updates mp in third consecutive semi final karnataka need 268 runs to win vbm