रवीचंद्रन अश्विन म्हणजे फिरकीचा जादूगार. दुर्मिळ विक्रमांना गवसणी घालण्याचा छंद असलेला आर अश्विन आता त्याच्या कसोटी कारकिर्दीत अजून एक मोठा टप्पा गाठणार आहे. धरमशाला इथे होणारी भारत आणि इंग्लंडविरूध्दची पाचवी कसोटी ही अश्विनच्या करियरमधील १००वा कसोटी सामना असणार आहे. अश्विन भारताकडून १०० वा कसोटी सामना खेळणारा १४वा तर तमिळनाडूचा पहिला वहिला खेळाडू ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विनने ६ नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरूध्दच्या सामन्यात भारताकडून कसोटी पदार्पण केले. त्याच्या या १३ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने अनेक दुर्मिळ कामगिरी आणि विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्याच्यासोबतच इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो, न्यूझीलंडचा शैलीदार फलंदाज केन विल्यमसन आणि टीम साऊदी हे देखील त्यांचा १०० वा कसोटी सामना खेळणार आहेत. एकाच कॅलेंडर वर्षात इतक्या खेळाडूंचा एकत्र १०० वा कसोटी सामना खेळणं हे पहिल्यांदाच जागतिक क्रिकेटच्या इतिहासात घडणार आहे.

जगातल्या उत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये अश्विनची गणना होते. अनिल कुंबळेंच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी आणि हरभजनच्या फिरकीची जादू कमी होत गेल्याने अश्विनला नावारूपाला येण्याची मोठी संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने खऱ्या अर्थाने सोनं केलं.

आता आपला १००वा कसोटी सामना खेळत असलेल्या अश्विनची गोलंदाजीची कामगिरी २२ खेळाडूंमध्ये (गोलंदाज/अष्टपैलू) ज्यांनी सर्वाधिक सामने आणि १०० कसोटी विकेट्स घेतले आहेत, या सगळ्यांमध्ये तो सर्वोत्कृष्ट आहे. शंभरावी कसोटी खेळत असतानाच ५०७ विकेट्सचा आकडा पाहता फक्त मुथय्या मुरलीधरन (५८४) यांनी त्यांच्या १००व्या कसोटी सामन्यापर्यंत जास्त विकेट घेतल्या होत्या. अश्विनचा कारकीर्दीतील स्ट्राइक-रेट (५१.३) देखील ९९ कसोटी सामने खेळलेल्या सर्व खेळाडूंमध्ये सर्वोत्तम आहे. अश्विनच्या कारकिर्दीतील स्ट्राइक-रेट देखील कसोटी इतिहासातील सर्व फिरकीपटूंमध्ये सर्वोत्तम आहे,ज्यात ४० गोलंदाजांचा समावेश आहे.

अश्विनने १३ वर्षांच्या कालावधीत आपल्या कौशल्याचे तेज कायम राखले आहे, हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकूण आलेखावरून दिसून येते. अश्विनची कारकिर्दीतील गोलंदाजीची सरासरी (२३.९१) आणि स्ट्राइक-रेट त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम आहे.

गेल्या दशकभरात कसोटीत भारताच्या घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवणाऱ्या खेळाडूंमधील महत्त्वाचा खेळाडू ठरलेल्या अश्विनने देशात खेळलेल्या जवळपास प्रत्येक मैदानात आपला दबदबा कायम ठेवला. जगातील उत्कृष्ट गोलंदाजांनी त्यांच्या घरच्या मैदानावरील काही निवडक मैदानांवर शानदार कामगिरी केल्या.

मुथय्या मुरलीधरनने श्रीलंकेतील तीन मैदानांवर (कोलंबो, कँडी आणि गॅले) १०० पेक्षा जास्त विकेट्स मिळवल्या. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी लॉर्ड्सवर १०० पेक्षा अधिक विकेट्स पटकावल्या आहेत, तर रंगना हेराथने गॉल आणि कोलंबो येथे अनुक्रमे १०२ आणि ८४ विकेट्स घेतल्या आहेत.

एका मैदानात गोलंदाजांनी किमान ५० कसोटी विकेट घेतल्याच्या ६८ घटना आहेत. भारतीया गोलंदाजांमध्ये, कुंबळेने दिल्ली अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ५८ आणि चेन्नईमध्ये चेपॉक स्टेडियमवर ४८ आणि हरभजनने कोलकात्यात इडन गार्डन्सवर ४६ विकेट्स घेतल्या आहेत.

पण अश्विनने मात्र कोणत्याही एकाच मैदानावर ३८ पेक्षा जास्त विकेट घेतलेल्या नाहीत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम स्पेल टाकला होता. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या खेळपट्यांवर त्याने आपल्या अद्वितीय गोलंदाजी कौशल्याने विकेट्स मिळवत संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिलं आहे.

अश्विन हा वयाच्या ३६ व्या वर्षी १० विकेट्स मिळवणारा एकमेव सर्वात वयस्कर भारतीय गोलंदाज आहे. त्याने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरूध्दच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. याचसोबत ३७ व्या वर्षी (३७ वर्षे १५९ दिवस) कसोटीत पाच विकेट घेणारा दुसरा सर्वात वयस्कर भारतीय गोलंदाज आहे. या यादीत विनू मांकड (३७ वर्षे २०६ दिवस) पहिल्या स्थानी आहेत.

अश्विनने त्रिफळाचीत आणि पायचीतमध्ये (एकूण २१४; त्रिफळाचीत –१०१, पायचीत –११३) फिरकीपटू म्हणून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत आणि अँडरसन (२३३) नंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अश्विनने ७४ फलंदाजांना भोपळाही फोडू दिलेला नाही. कुंबळे (७७) नंतर कसोटीत भारतीय गोलंदाजाची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. अश्विनने त्याच्या कारकिर्दीत फक्त १० नो-बॉल टाकले आहेत, जे त्याच्याकडून २०२१ ते २०२२ दरम्यान लागोपाठ पाच मालिकांमध्ये टाकले गेले.

अश्विनने सामन्यात गोलंदाजीची सुरूवात करत किंवा दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करत ४४ सामन्यांमध्ये १७० कसोटी विकेट्स घेतले.फिरकीपटूंमध्ये हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे, रंगना हेरथ (१०४) हे या यादीत अश्विनसोबतचे एकमेव गोलंदाज आहेत, ज्यांनी १०० पेक्षा जास्त विकेट घेतले.

नवा चेंडू हाताळणं ही सर्वसाधारणपणे वेगवान गोलंदाजांची जबाबदारी असते. पण अश्विनने नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारीही समर्थपणे पेलली आहे. अश्विनने नव्या चेंडूसह गोलंदाजी करताना १७० विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या एकूण विकेट्सपैकी हे प्रमाण ३३.५ टक्के एवढं आहे. नव्या चेंडूसह गोलंदाजी करणाऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये ही आकडेवारी सर्वोत्तम अशी आहे. रंगना हेराथने अश्विनप्रमाणे नव्या चेंडूने गोलंदाजी करताना शंभराहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेच्या विश्वा फर्नांडोच्या विकेटसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १०० विकेट्स पूर्ण करणारा अश्विन हा पहिला गोलंदाज होता.

घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवत असलेल्या अश्विनने भारताचा सर्वात मोठा एक्स फॅक्टर म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. त्याच्या पदार्पणापासून, भारताने घरच्या मैदानावर ५९ पैकी ४४ सामने जिंकले, जे या कालावधीतील सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये ७.३३३ चे विजय/पराजय गुणोत्तर आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यात भारताने इतर कोणत्याही संघापेक्षा (२३ सामने) जास्त कसोटी जिंकल्या आहेत.

घरच्या मैदानावर भारताला हरवणं अत्यंत अवघड समजलं जातं. प्रतिस्पर्ध्यांसाठी भारत हा अभेद्य बालेकिल्ला होण्यात अश्विनचा सिंहाचा वाटा आहे. अश्विनच्या पदार्पणापासून भारताने घरच्या मैदानावर खेळलेल्या ५९ कसोटींपैकी ४४ मध्ये विजय मिळवला आहे. ७.३३३ हे विजयी होण्याचं प्रमाण कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये सर्वोत्तम असं आहे. याच काळात भारताने विदेशात अधिक सामने जिंकले आहेत.

यापैकी ५८ विजयी सामन्यांमध्ये अश्विनने ३५४ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. सर्व भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम ठरत मुरलीधरन, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा आणि अँडरसन यांच्यानंतर तो पाचव्या क्रमांकावर आहे. अश्विनने या ५८ कसोटीत १९.११च्या स्ट्राईकरेटने ३५४ विकेट्स घेतल्या आहेत.

सध्या सुरू असलेली इंग्लंडविरूध्दची कसोटी मालिका अश्विनसाठी कठीण ठरली होती पण रांची कसोटीत त्याने डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली. या मालिकेतील त्याची सरासरी (३०.४१) इंग्लंडच्या २०१२-१३ च्या भारतातील विजयी दौऱ्यानंतरची त्याची सर्वात कमी सरासरी आहे, तर त्याचा इकोनॉमी रेट (३.९५) हा सर्वात कमीच आहे.

पण या हुशार फिरकीपटूने वैयक्तिक आव्हाने पेलत आणि बेन स्टोक्सच्या खेळाडूंना चोख उत्तर देत १७ विकेट्स मिळवल्या. भारतासाठी सर्वाधिक विकेटच्या कुंबळेच्या विक्रमाची रांची कसोटीत बरोबरी साधली. अश्विनने धर्मशालामध्ये २०१७ ऑस्ट्रेलियामध्ये विरूध्द एक कसोटी सामना खेळला आहे. ज्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत.

आतापर्यंत फक्त तीन गोलंदाजांनी त्यांच्या १०० व्या कसोटीत ५ विकेट्स घेण्याची कमाल केली आहे. मुरलीधरन विरुद्ध बांगलादेश (फेब्रुवारी २००६ मध्ये ६/५४ सह ९ विकेट); शेन वॉर्न विरुद्ध दक्षिण आफ्रिका (मार्च २००२ मध्ये ६/१५१ सह ८ विकेट); अनिल कुंबळे विरुद्ध श्रीलंका (डिसेंबर २००५ मध्ये ५/८९ सह ७ विकेट). त्यामुळे अश्विनला आता त्याच्या कारकिर्दीत अजून एका दुर्मिळ कामगिरी करण्याची मोठी संधी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin 100th test career statistical breakdown ind vs eng dharamsala bdg