Sanjay Manjrekar Statement On Virat Kohli: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णज घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने दमदार फलंदाजी केली. भारताकडून केएल राहुल यशस्वी जैस्वाल यांनी ९१ धावांची सलामी दिली. ज्यावेळी केएल राहुल फलंदाजी करत होता त्यावेळी समालोचन करत असलेल्या संजय मांजरेकरांनी असं काही म्हटलं, ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी केएल राहुल फलंदाजी करत असताना संजय मांजरेकर समालोचन करत होते. त्यावेळी ते म्हणाले, ” दोन्ही फलंदाज ऑफ साईडच्या बाहेर जाणारे चेंडू सोडून देत आहेत. जैस्वालनेही असंच केलं आहे. जो फुल लेंथ चेंडू स्टंपच्या दिशेने आला त्या चेंडूवर त्याने ड्राईव्ह मारली आहे. जो चेंडू स्टंपपासून खूप दूर आहे त्या चेंडूवरही दोघांनी धावा जमा केल्या आहेत. पण केएल राहुलने आतापर्यंत एकही चेंडू सोडलेला नाही जो फुल लेंथ असेल आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जात असेल. पण जो चेंडू ऑफ स्टंपपासून खूप बाहेर आहे त्यावर त्याने कव्हर ड्राईव्ह मारली आहे.”
संजय मांजरेकरांनी नाव न घेताच विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. विराट कोहली अनेकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेलबाद झाला आहे. समालोचन करताना ते पुढे म्हणाले, ” तुम्ही आता जे काही पाहत आहात, ते या दोन्ही फलंदाजांची बुद्धिमत्ता दर्शवते. यांच्या बुद्धिमत्तेला मी सलाम करतो. आपल्याला एक माजी फलंदाज माहित आहे जो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर शॉट खेळायचा प्रयत्न करायचा आणि अडचणीत यायचा.”
विराट कोहलीबद्दल कोणीही वाईट कमेंट करत असेल हे विराट कोहलीच्या फॅन्सला मुळीच आवडत नाही. संजय मांजरेकरांनी हे वक्तव्य करताच, नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं . भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खेळी केली. केएल राहुलने ४२ धावांची खेळी केली. तर शुबमन गिल १४७ आणि ऋषभ पंतने १३३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४७१ धावा केल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd