India vs Bangladesh Semi Final Match Updates: आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता टीम इंडियाचा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यातील विजेत्याशी होणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्याबरोबरच भारताने किमान रौप्य पदकाचीही खात्री केली आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने सहज सुवर्णपदक पटकावले होते आणि पुरुष संघाकडूनही अशीच अपेक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या स्पर्धेत भारतीय संघाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. अशा स्थितीत भारताला उपांत्यपूर्व फेरीत थेट नेपाळविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. भारताने नेपाळचा २३ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता भारत सुवर्णपदक जिंकण्यापासून एक विजय दूर आहे.

भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला ९६ धावांत रोखले –

भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिली विकेट १८ धावांवर पडली. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला आणि ९६ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून झाकीर अलीने सर्वाधिक नाबाद २४ धावा केल्या. परवेझ हुसेनने २३ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय फक्त रकीबुल हसन (१४ धावा) दुहेरी आकडा पार करू शकला. बांगलादेशचे सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. दोन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. सात आणि एका धावेदरम्यान पाच फलंदाज बाद झाले. भारताकडून साई किशोरने तीन विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – World Cup 2023: पहिल्या सामन्याआधीच भारताला मोठा धक्का; शुबमन गिल मुकण्याची शक्यता!

९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल खाते न उघडता बाद झाला. मात्र, यानंतर तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी स्फोटक शैलीत धावा केल्या. चौथ्या षटकातच भारताची धावसंख्या ५० धावांपर्यंत पोहोचली. तिलकने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले आणि टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर होती. भारताने ९.२ षटकात एक विकेट गमावून ९७ धावा केल्या आणि सामना जिंकला. तिलक वर्मा २६ चेंडूत ५५ धावा आणि ऋतुराज गायकवाड २६ चेंडूत ४० धावा करून नाबाद राहिले. बांगलादेशकडून रिपन मोंडलने एकमेव विकेट घेतली.

हेही वाचा – दीपिका-हिरदर जोडीला सुवर्ण; सौरव घोषालचे रौप्यपदकावर समाधान

आता सुवर्णपदकासाठी होणार सामना-

उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता टीम इंडिया शनिवारी सुवर्णपदकासाठी सामना खेळणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india defeated bangladesh by 9 wickets and reached the final in 19th asian games vbm