Virat Kohli Plays Under My Captaincy said Tejasvi Yadav: भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली महान फलंदाज म्हणून ओळखला जातो. विराट कोहलीसंबंधित केलेली वक्तव्य कायमचं जोर धरून असतात. अशातच राजकारणी असलेल्या एका माजी क्रिकेटपटूने विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भारताचा रनमशीन विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले, जे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आहे. ते स्वतः खूप छान क्रिकेट खेळले आहेत.
बिहारचे नेते तेजस्वी यादव आपला क्रिकेट अनुभव सांगून चर्चेत आले आहेत. भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीबाबत त्यांचे वक्तव्य व्हायरल होत आहे. झी मिडियाला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी यांनी म्हटले आहे, “मी एक क्रिकेटर होतो आणि याबद्दल कोणीही बोलत नाही. विराट कोहली माझ्या कर्णधारपदाखाली खेळला आहे. याबद्दल कोणी कधी काही बोललं आहे का? एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून मी चांगले क्रिकेट खेळलो. टीम इंडियाचे अनेक खेळाडू माझे बॅचमेट आहेत. माझे दोन्ही लिगामेंट फ्रॅक्चर झाल्याने मला क्रिकेट सोडावे लागले.” भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेले अनेक खेळाडू त्यांचे बॅचमेट असल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा –
तेजस्वी यादव यांची क्रिकेट कारकीर्द
३४ वर्षीय तेजस्वी यादवच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, एका प्रथम श्रेणी सामन्याव्यतिरिक्त, त्यांनी दोन लिस्ट ए आणि चार टी-२० सामने खेळले. २००९ मध्ये त्यांनी झारखंडसाठी पदार्पण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या २० धावा आणि लिस्ट ए मध्ये १४ धावा आहेत. तेजस्वीने टी-२० च्या एका डावात ३ धावा केल्या. गोलंदाजीबद्दल बोलायचे तर एक विकेट घेण्यात त्यांना यश मिळाले. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हिल्स) भागही राहिला आहे.
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली विराट कधी खेळला?
विराट कोहली दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. तेजस्वी यांनीही क्रिकेट दिल्लीसाठीच खेळले आहे. तेव्हा विराट कोहली त्यांच्या नेतृत्वाखाली खेळला, असे त्यांचे म्हणणे आहे. २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी राजकारणात प्रवेश केला. क्रिकेट खेळत असताना त्यांनी २०१० मध्ये त्यांचा पक्ष आरजेडीचा प्रचार सुरू केला होता. यानंतर २०१५ मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली आणि बिहारचे उपमुख्यमंत्री पदही त्यांना मिळाले.
© IE Online Media Services (P) Ltd