Anjum Chopra on Harmanpreet Kaur: भारताची माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्राने नुकत्याच झालेल्या भारत महिला आणि बांगलादेश महिला यांच्यातील एकदिवसीय सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरच्या कृतीवर आपले मत व्यक्त केले आहे. अंजुम चोप्राला वाटते की, “हरमनप्रीत कौर देखील नंतर मान्य करेल की तिने तिच्या प्रतिक्रियांबद्दल अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे होती.” भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिला पायचीत म्हणून बाद देण्यात आले होते. अंपायर्सच्या निर्णयावर असमाधानी असलेल्या हरमनप्रीत कौरची मैदानावर असलेले अंपायर तन्वीर अहमद यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. तिने अंपायरशीही वाद घातला आणि मैदान सोडण्यापूर्वी रागाच्या भरात स्टंपवर बॅट फेकून मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरमनप्रीत कौर देखील मान्य करेल की तिने अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भारताची माजी महिला कर्णधार अंजुम चोप्राला विचारण्यात आले की, “हरमनप्रीत कौरने तिच्या कृतींबाबत अधिक सावधगिरी बाळगायला हवी होती का?” अंजुम चोप्राने यावर उत्तर दिले की, “ती नंतर शांत झाल्यावर तिला देखील हे मान्य असेल की आपण जे केले ते अधिक सावधगिरी बाळगून करता आले असते.”

अंजुम चोप्रा पुढे म्हणाली,“जेव्हा तिचा राग निवळेल आणि शांत होईल तेव्हा मला खात्री आहे तिला हे आवडले नसेल. ती मागे वळून पाहील आणि तिनेच केलेल्या कृतीवर असहमती दर्शवेल. तिने तिची असहमती दर्शविताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक होते, हेच हरमन देखील सांगेल. तुमची नाराजी व्यक्त करण्यात काही नुकसान नाही. राग व्यक्त करणे चुकीचे नाही पण तुम्ही ते कसे आणि केव्हा करता ते महत्त्वाचे आहे. तिने भावना व्यक्त करताना आपले शब्द आणि कृती याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे होते.”

हेही वाचा: Rishabh Pant: पुढच्या वर्षीही ऋषभ पंत आयपीएल खेळणार नाही? दिल्लीच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचे मोठे विधान

अंजुम चोप्राने असेही अधोरेखित केले की, सामन्यादरम्यान कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते त्यामुळे बाद ठरवणे कठीण होते. मात्र, भारतीय कर्णधाराने हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने हाताळायला हवे होते. याबाबतीत बोलतना अंजुम चोप्रा पुढे म्हणाली, “कोणतेही स्निकोमीटर किंवा बॉल-ट्रॅकिंग उपलब्ध नव्हते, त्यामुळे बाद की नाबाद ठरवणे थोडे कठीण आहे. पण जर त्यांना (भारतीय संघाला) वाटत असेल की काही निर्णय त्यांच्या बाजूने लागले नाहीत तर गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळता आल्या असत्या का? यावरही थोडा विचार व्हायला हवा. तसेच, भारतीय कर्णधाराने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनला जाऊन तिची नाराजी दाखवणे योग्य होते का? याचा विचार केला पाहिजे.”

भारताची माजी कर्णधार डायना एडुलजी हिने देखील हे दुख:दायक असल्याचे सांगितले. ती म्हणते, “हरमनप्रीतने अंपायर्सना बांग्लादेश संघासोबत पोज देण्यासाठी बोलावले आणि ते संघाचा एक भाग आहेत, ते त्यांच्यासाठी खेळत आहेत हे दर्शवणे पाहणे दु:खदायक होते. मला माहिती आहे की, हरमनला लगेच राग येतो त्यामुळे ती पटकन प्रतिक्रिया देते. कदाचित यामुळे लोकांना वाटत असेल की उद्धट आहे किंवा तसे वर्तन करते. मात्र, प्रेझेंटेशन समारंभातही विरोध सुरू ठेवल्याने तिने त्या दिवशी मर्यादा ओलांडली जे गैर होते.”

हेही वाचा: Rohit Sharma: हिटमॅन झाला किंग कोहलीचा चाहता; सामन्यानंतर म्हणाला, “विराटसारखा खेळाडू डाव सावरण्यासाठी…”

हरमनप्रीतच्या प्रतिक्रिया केवळ मैदानापुरत्या मर्यादित नव्हत्या. सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान, तिने सामन्यातील अंपायरिंगला खालच्या दर्जाचे म्हटले. सामन्यानंतर बांगलादेश संघासोबतच्या संयुक्त फोटो सत्रादरम्यान तिने अंपायर्सबद्दल उपहासात्मक टिप्पणीही केली. तिची प्रतिक्रिया ऐकून बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना एकत्रित फोटो सेशन सोडून निघून गेली. हरमनप्रीत कौरच्या वागण्यावर ती नाराज होती. वृत्तानुसार, भारतीय कर्णधाराला तिच्या मॅच फीच्या ७५ टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will harmanpreet regret it asked by former female captain saying its not wrong to express anger but words to be used carefully avw