गेल्या काही वर्षांपासून ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात उष्णता कहर करू लागली आहे. मुंबईमध्येच तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचला नाही तर अंगाची काहिली होते, मग जिथे तापमान ४० अंशाच्या वर जात असेल तिथे लोकांची काय अवस्था होत असेल? दुर्दैवाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास जाऊ लागले आहे, अगदी मुंबईलगतच्या ठाण्यामध्येही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Health special: नेटफ्लिक्सवरील मालिकांचा आणि डोपामिन व व्यसनाचा काय संबंध?

पृथ्वी ही केवळ आपल्याच मालकीची आहे या स्वार्थी व चंगळवादी वृत्तीने निसर्गाचे लचके तोडणार्‍या मानवाच्या अघोरी कृतींचा परिणाम आहे हा खरे तर. साहजिकच त्याचे परिणामसुद्धा भोगायला लागतील. निसर्गचक्रात झालेल्या बिघाडामुळे अनुभवास येणार्‍या अतिरेकी उष्म्याचा शरीरावर होणारा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे उष्माघात आणि उष्माघात होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरामधील द्रवहानी अर्थात पाणी कमी होणे. शरीरातले पाणी कमी झाल्यानेच उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका बळावतो. कारण आपल्या शरीराचा ६६% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे व शरीरामधून घटणार्‍या पाण्याची पूर्ती आपल्याला सातत्याने करावी लागते. मग शरीरातले पाणी कमी होत आहे, हे कसे ओळखावे?

आणखी वाचा : Health special: तृणधान्ये का खावीत?

पाण्याच्या कमतरतेची जाणीव तहानेने होते, हे तर अनुभवजन्य सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या प्रमाणात पाण्याची गरज असेल तितक्या मात्रेमध्ये पाणी पिणे वाढवायला हवे. तहान ही एक नैसर्गिक संवेदना आहे. मात्र ही तहानेची जाणीव काही जणांमध्ये व्यवस्थित काम करीत नाही. विशेषकरुन ज्यांना तहान लागल्याचे बोलून सांगता येत नाही त्या लहान मुलांना, ज्यांच्या भूक, तहान या नैसर्गिक संवेदना वयानुसार क्षीण होत जातात त्या वृद्धांमध्ये; इतकेच नव्हे तर दीर्घकाळापासून तहानेकडे दुर्लक्ष करण्याची आणि पाणी न पिण्याची सवय लागलेल्यांमध्येही. त्यामुळे यांच्याकडून पाणी कमी प्यायले जाते आणि शरीरातले पाणी घटण्याचा धोका बळावतो. याशिवाय कोणत्याही कारणाने उघड्यावर उन्हातान्हांत काम करणारे, खेळणारे आणि बंदिस्त जागेत उष्णतेजवळ काम करणारे यांनाही. या सर्वांच्या शरीरामध्ये उष्माघातामुळे शरीरामधील पाणी घटण्याचा धोका बळावतो.

आणखी वाचा : मधुमेद आणि झोप नेमका संबंध काय?

सर्वसाधारण वातावरणामध्ये शरीरामधून पाऊण लिटर पाणी घामावाटे फेकले जाते, मात्र आपण जो उन्हाळा अनुभवत आहोत, त्यामध्ये घामाचे प्रमाण कैकपटींनी वाढते व शरीरामधून पाण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटते. भरपूर घाम हा एकीकडे शरीराला थंडावा देतो, तर दुसरीकडे शरीरामधील पाणी व क्षार यांचे प्रमाण घटवतो. अतिघाम व
त्यामुळे येणारा थकवा व लागणारी तहान ही उष्माघातामध्ये लक्षात येणारी लक्षणे आहेत, हे ओळखून त्वरित नारळपाणी, लिंबू सरबत, फळांचे रस यांचे प्राशन करावे. मात्र सध्या अनेक जण दिवसभर एसीच्या थंड वातावरणात असतात, ज्यांना घाम असा येतच नाही. मग त्यांनी आपल्या शरीराला पाणी कमी पडत आहे, हे कसे ओळखावे?

शरीरामध्ये पाणी कमी होत असल्याची परीक्षा म्हणजे मूत्राचा बदलणारा वर्ण! लघवीचा रंग पिवळसर, पिवळा, गडद पिवळा किंवा तपकिरी (ब्राऊनिश) होऊ लागला की त्या रंगाच्या गडदपणानुसार शरीरामध्ये अधिकाधिक पाणी कमी होत चालले आहे, हे समजावे. मूत्राचा रंग जितका गडद( डार्क) तितके शरीराला पाणी कमी पडत आहे हे निश्चित, हे
ओळखून पाणी, नारळपाणी व इतर द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवावे (चहा, कॉफी, मद्य मात्र कटाक्षाने वर्ज्य) (बी-कॉप्लेक्स घेत असताना सुद्धा मूत्राचा रंग पिवळा येतो आणि काविळीमध्येही मूत्रवर्ण पिवळा-तपकिरी होतो, मात्र सोबत भूक न लागणे, मळमळ, अन्नाप्रति द्वेष, ताप वगैरे अन्य लक्षणेही असतात, हे विसरू नये!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special tips heat why does water content in body gets down how to identify it dc vp