देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. तसंच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. त्यांचे नशीब मोठे आहे असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नागपुरात केलं. "देवेंद्रजी यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्रीपदीह अल्पायु आहे. लोकशाहीत कमीअधिक घडत असते." नागपुरात साधना बँकेचा लोकार्पण सोहळ्यात भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हेदेखील मंचावर उपस्थित होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर जनमताचा कौल हा महायुतीलाच मिळाला होता. मात्र शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदाचा वाद विकोपाला गेला आणि शेवटी दोन्ही पक्षांचा काडीमोड झाला. त्यानंतर भाजपाने अजित पवारांची साथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथही घेतली. मात्र हे सरकार अवघं ७२ तास चाललं. त्यानंतर अजित पवारांनी फडणवीस यांची साथ सोडल्याने फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यानंतर विरोधात बसण्याचा निर्णय भाजपाने घेतला. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते झाले. हे सगळं राजकारण महाराष्ट्राने पाहिलंच. मात्र त्याबाबत आणि खासकरुन देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भय्याजी जोशी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. तसंच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही असं भय्याजी जोशी म्हणाले आहेत. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच याबाबत स्पष्टीकरण देऊन मी दिल्लीत जाणार नाही. महाराष्ट्रातच राहणार. मी मैदान सोडणाऱ्यांमधला नाही असं सांगत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता भय्याजी जोशी यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.