मराठवाडय़ातील प्रकल्प, पाणीप्रश्न लवकरच मार्गी मुंबई : मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे मराठवाडय़ातील पाण्याअभावी थांबलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील, तसेच मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहिती देताना जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले की, गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचे पाणी वापर संरक्षित असून त्यानंतर ६० टीएमसी पाणी वापरास मान्यता दिलेली होती. गोदावरी खोऱ्यात १९७५च्या आधी पाणी वापर केलेला होता. त्यामध्ये पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी महाविकास आघाडी शासनाच्या जलसंपदा विभागाने आता दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे आता मध्य गोदावरी उपखोऱ्यात एकू ण (६० + ६१.२९ = १२१.२९) टीएमसी पाणी वापराचे नियोजन करणे शक्य आहे. हे लक्षात घेत १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता दिली आहे. या मान्यतेनुसार आता अतिरिक्त १९.२९ टीएमसी पाणी वापर मंजूर झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाडय़ाला करता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते, त्यातील काही प्रकल्प तिथे पाणी उपलब्धता आहे आणि पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्य़ातील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे पूर्णपणे दूर होतील, अशी माहिती जलपंदा मंत्र्यांनी दिली. अलीकडेच जयंत पाटील यांनी मराठवाडय़ाचा दौरा करत या भागातील पाटबंधारे प्रकल्पांचे प्रश्न जाणून घेतले होते. यावेळी मराठवाडय़ात जास्तीत जास्त पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची टप्प्याटप्प्याने पूर्तता होत असल्याचे त्यांनी सांगितले.