राज्यात नवं सरकार स्थापन होऊन जवळपास महिना उलटला आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यात भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अजूनही खातेवाटप मात्र झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. पुण्यात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवतानाच अजित पवार यांनी नवं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का? या प्रश्नावर देखील सूचक वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ते राजकीय शहीद झाले असते की…”

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केलेल्या एका विधानाचा यावेळी अजित पवारांनी समाचार घेतला. “बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तर…मी शहीद होण्याचा धोका होता, मी शहीद झालो असतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवारांनी खोचक टिप्पणी केली आहे. “त्यांच्या मनात अशी भिती का यावी? ते राजकीय शहीद झाले असते की खरोखर शहीद झाले असते ते कसं सांगावं? पण राज्यातल्या जनतेला या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“कार्यालयात लोक तर आले पाहिजेत”

आत्तापर्यंत एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगितलेला असताना आपणच खरी शिवसेना असल्याचा देखील दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत शिंदे गटाचं पहिलं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “तो त्यांचा अधिकार आहे. तो विषय न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर आहे. कुणी कुठे कार्यालय काढायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण कार्यालय काढल्यानंतर तिथे लोक सुद्धा भेटायला यायला पाहिजेत. लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे. लोक बघत आहेत. यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी फोडाफोडी केली की जनतेसाठी केली हे जनता ओळखते”, असं अजित पवार म्हणाले.

“त्या दोघांचा एक आवडता शब्द झाला आहे, तो म्हणजे…”, अजित पवारांचा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना टोला!

१४५ चा जादुई आकडा!

दरम्यान, याआधी ठाकरे सरकारच्या काळात भाजपाकडून सरकार कोसळण्याचे मुहूर्त दिले जात होते. मात्र, आता अजित पवार यांनी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकेल का? या प्रश्नावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाचंही सरकार आलं, तरी जोपर्यंत १४५ चा जादुई आकडा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता, तोपर्यंतच ते सरकार टिकत असतं. आत्ताचा विचार करता ज्या दिवशी ते १४५ चा आकडा पूर्ण करू शकणार नाहीत, त्या दिवशी हे सरकार कोसळेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar slams eknath shinde goup warns government collapse if loose mejority pmw
First published on: 13-08-2022 at 16:20 IST