भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षात अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाही. ते उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात काय केलं? असं विचारत आहेत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे. याला आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “मंत्रालयात आल्यानेच काम होत असते, तर फार परिवर्तन झालं असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना काळात कुठे-कुठे गेले होते, हे विचारलं पाहिजे. अडीच वर्षांत काय केलं, हे एका थंबवर कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना आणि धारावीतील जनतेला विचारा. महाराष्ट्राच्या इतिहासातील अभुतपूर्व काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.”

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

“केंद्रातील मंत्र्यांना कवडीचेही काम नाही. केंद्रीय मंत्र्यांना २६ दिवसांचे दौरे दिले जातात. मंत्री जनतेची काय कामे करतात? पण, उद्धव ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह नाही. तरीही त्यांच्याविरोधात केंद्र आणि राज्यातील मंत्री दळण दळतात. यातच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ताकद दिसून आली आहे,” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve attacks chandrashekhar bawankule over uddhav thackeray critics ssa