आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात जाऊन ते जनतेशी संवाद साधत आहेत. यादरम्यान, त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील गांधी चौकात जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोकण दौऱ्यावरही टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“गेले काही दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघ, रायगड लोकसभा मतदारसंघ आणि आज सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात मी संवाद सुरू केला आहे. चांदा ते बांदा म्हणतात, पण मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा येईन’च्या घोषणा देत होते तेव्हा टरबूज होते, आता पार…”, उद्धव ठाकरेंचा टोला

“निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटेल तेव्हा फुटेल. पण मी तेव्हा या मतदारंसघात येणार आहे. आणि मला खात्री आहे की प्रचारासाठीच नव्हे तर विजयाच्या सभेलाही येणार आहे. कारण, कोकण माझा आहे. तुमच्यावर जुलूमजबदरस्ती केली होती तेव्हाही तुम्ही ताठ मान करून होतात. एक काळ असा होता की कोकणात गुंडा गर्दीचं थैमान होतं”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पाणबुडी प्रकल्प मी आणला

“कोकणाला सागरी किनारा लाभला आहे. महाविकास आघाडीच्या काळात पर्यटनासाठी एक प्रकल्प आला होता. या प्रकल्पाविषयी माहिती घेऊन या प्रकल्पाला मी मान्यताही दिली. तो प्रकल्प होता पाणबुडी पर्यटन प्रकल्प. पण, गद्दारी करून सरकार पाडलं गेलं”, असं ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, “मधल्या काळात मालवणला नौदल दिन साजरा झाला. मलाही बरं वाटलं की अटलजींच्या जे लक्षात आलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं. प्रथमच कोकणात नौदल दिन साजरा झाला. शक्तीप्रदर्शन झालं. पंतप्रधान या कार्यक्रमासाठी आले. ते पंतप्रधान पहिल्यांदा कोकणात येणार असतील तर भरघोस देऊन जातील, असं मला वाटलं. पण त्यांनी काहीच दिलं नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atalji did not notice that uddhav thackerays criticism of modis konkan tour sgk