दयानंद लिपारे, कोल्हापूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या गडावर आता भगवा फडकू लागला आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला बारामती आणि साताऱ्याची उदयनराजेंनी जागा वगळता सर्व किल्ले भाजप -शिवसेनेच्या ताब्यात गेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी या पतनाला सुरुवात झाली होती. त्यातून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीच बोध न घेतल्याने त्यांचे पानिपत झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रासारख्या बुलंद गडात शक्तिपात झाला असताना विधानसभेसाठी उमेद जागवायची कशी, हाच खरा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना सतावू लागला आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसला खरे बळ मिळाले ते पश्चिम महाराष्ट्रातून. दोन दशकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला तेव्हा घडाळ्याची टिक टिक याच भागात वाजू लागत होती. किंबहुना, राष्ट्रवादी पक्षाचे अंगण पश्चिम महाराष्ट्रापुरते सीमित झाले होते. राज्यात कुठेही पराभव झाला तरी उभय काँग्रेसची भिस्त पश्चिम महाराष्ट्रावर असे. येथील तगडे सुभेदार जबाबदारी पेलण्यास सक्षम होते. पण यातील अनेकांची एक कमजोरी होती. ती म्हणजे सत्तासंगत. सत्तेच्या खुर्चीविना राजकारण अपुरे असल्याची बोच कायम असे. त्यामुळे सत्ता कोणाकडे जाणार याचा अंदाज घेऊन सार्वत्रिक निवडणुकीआधी आणि तेही जमले नाही तर नवे सरकार आल्यावर सत्तेच्या लोभासाठी पक्षांतर करण्याची प्रवृत्ती वाढली होती. या निवडणुकीत ते अधिक ठळकपणे पुढे आले. याच सुभेदारांच्या सहकार्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजप- शिवसेनेला पाय रोवून उभे राहता आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, अण्णासाहेब पाटील मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित नाईक निंबाळकर अशा मूळच्या काँग्रेसच्या सुभेदारांनी महायुतीच्या यशाचा मार्ग प्रशस्त केला.

रणनीतीमधील फरक

पश्चिम महाराष्ट्रातील लढत सोपी नाही याची जाणीव महायुतीच्या नेतृत्वाला होती. केवळ जिंकायचेच या हेतूने युतीच्या प्रमुखांनी वाटून घेतलेले मतदारसंघ बेरजेचे राजकारण, साखर सम्राटांना घातलेली साद, तळातून उभी केलेली प्रचार यंत्रणा, दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांच्या वैगुण्यांवर चढवलेला हल्ला या आयुधांच्या आधारे महायुती बालेकिल्लय़ाला सुरुंग लावत राहिली. उभय काँग्रेस मात्र पारंपरिक राजकीय चालींच्या जोखडात अडकून पडली. सत्ताधाऱ्यांचे अपयश, जातीय गणिताची मांडणी, स्थायिक प्रभाव याआधारे विजयाचा उंबरठा सहजपणे ओलांडू अशा गृहीतकांवर त्यांचा विश्वास होता. महायुतीच्या बदलत जाणाऱ्या रणनीतीला भेदून आपला प्रभाव टिकून राहील, अशी व्यवस्था करण्यात महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरली.

पराभवाचे उट्टे

हातकणंगलेत शिवसेनेचे धैर्यशील माने यांना ‘बच्चा’ समजण्याची चूक राजू शेट्टी यांनी केली. पण, येथे जैन धर्मीय राजू शेट्टी आणि मराठा माने असा रंग दिला गेला. तो बदलणे किंवा त्याला बगल देणारा प्रभावी मुद्दा पुढे आणणे काँग्रेस आघाडीच्या कोणालाच शक्य झाले नाही. शेट्टी साखर सम्राटांच्या गळ्यात गळे घालत असल्याच्या मुद्दावरून होणार टीकेचा भडीमार दूर करण्यात सारे निस्तेज ठरले. शेट्टी यांना कधीकाळी सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्यावरून विशाल पाटील यांच्याशी झगडावे लागले होते. दोघांत कलगीतुरा रंगला होता. तेच विशाल पाटील स्वाभिमानाची बॅट घेऊन मैदानात उतरणे मतदारांना रुचले नाही. नाराजी असतानाही संजयकाका पाटील यांनी अलगद बाजी मारली. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे आव्हान शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी सहजपणे मोडीत काढून मागील पराभवाचे उट्टे काढले.

बहुजन वंचित आघाडीचा युतीला लाभ

हातकणंगले असो वासांगली. येथे महाआघाडीचा डाव मोडण्यात वंचित आघाडी कारणीभूत ठरली. दोन्ही ठिकाणी वंचित आघाडीला पडलेली मते पाहता याची प्रचिती येते. सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागताना वंचित आघाडीच निर्णायक ठरली. दलित, मुस्लिम मतदारांवर काँग्रेसची मोठी भिस्त होती. हा वर्ग लक्षणीय प्रमाणात वंचित आघाडीकडे वळला. या धक्कय़ातून उभय काँग्रेस सावरू शकली नाही. शिंदे – प्रकाश आंबेडकर यांच्यातील स्पर्धेत खासदारकीची खुर्ची भाजपच्या  जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी मिळवली. माढा तर सुरुवातीपासून चर्चेत राहिला. शरद पवार हे स्वत: लढण्याच्या तयारीत होते, तेव्हा मोहिते पाटील गटाकडून ‘माढा आणि पवारांना पाडा’ अशा संदेशाचा पाढा सुरु ठेवल्याने पवारांनी पवित्रा बदलला. राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे यांना उमेदवारी दिली असली तरी येथे पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करून विजयसिह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला पहिला धक्का दिला.

सुळे, उदयनराजेंनी पत राखली

गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील दोन जागा वगळता अन्य जागी उभय काँग्रेसने बाजी मारली होती. यंदा हे सारे गड ढासळत असताना बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि सातारा येथून उदयनराजे भोसले यांनी पत राखली. अर्थात, या दोघांचाही विजय तितकासा सोपा नव्हता हे निकालाचे आकडे वरखाली होत असताना दिसून आले. सुळे यांचा पराभव करण्याच्या इराद्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिथे एक घर घेऊन मुक्काम ठोकला होता. वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करीत राहिले. संकेत दिसू लागल्याने निकालापूर्वीच पवारांनी ‘ईव्हीएम मशीन’वर खापर फोडण्याची तयारी केली होती. शेवटी, सुळे यांनी गतवेळेपेक्षा अधिक मताधिक्य घेत बारामती पवारांचीच आहे, हे दाखवून दिले. स्वत:चा करिष्मा उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात दाखवून दिला असला तरी मताधिक्य उतरणीला लागले आहे.

विधानसभा निवडणुकीचे आव्हान

खरे तर पश्चिम महाराष्ट्रातच काँग्रेस – राष्ट्रवादीची पीछेहाट सुरू झाली आहे. भाजप – शिवसेनेचा विस्तारलेला पट आवरणे आघाडीला कठीण असल्याचे दिसत आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि आता लोकसभेचे निकालही युतीच्या बाजूने जाताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत त्यास भेदणे हे काँग्रेस -राष्ट्रवादीसमोर खरे आव्हान असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena alliance big challenge to congress ncp in western maharashtra