रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. एनडीआरएफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे दबली गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
“रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा”, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
“दरड जिथे कोसळली तो भाग दरडप्रवण क्षेत्रात नव्हता. ही घटना समजल्यानंतर, साडेसात पर्यंत नियंत्रण कक्षात बसून होतो. एकंदरीतच पाच लोक अद्यापपर्यंत दगावली आहे. जखमींना पनवेल, एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरने छोटं मशिन पाठवायचं असेल तर ते एक टन पर्यंतच वजन उचलू शकत आहे. तसंच, हवामान खराब असल्याने टेक ऑफ करता येत नाही”, अशी माहिती अजित पवारांनी सकाळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
हेही वाचा >> इर्शाळगड दरडप्रवण क्षेत्र होते का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
“राज्याचे प्रमुख घटनास्थळी दाखल झाल्याने सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. मातीची ढिगारे उचलण्यासाठी आता माणसांशिवाय पर्याय नाही. मदतकार्यासाठी तिथे ५०० – ७०० माणसे पोहोचली आहेत. अजून काही माणसं पाठवली आहेत. ठराविक काळात हे काम करावं लागणार आहे. आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत”, असंही अजित पवार म्हणाले.
माळीणच्या घटनेनंतर मागवला होता अहवाल
“माळीणची घटना जी घटना घडली. त्यानंतर आपण भारतीय भूवैज्ञानिक समिक्षण विभागाचा अहवाल मागवला. की आमच्या राज्याची परिस्थिती काय आहे. यामध्ये संभाव्य दरड प्रवण क्षेत्राची यादी करायला सांगितली आहे. त्यामुळे हा भाग दाखवलेला नाही. याआधी येथे दरड कोसळलेली नव्हती. येथे भूस्खलन होण्याच्या घटना निदर्शनास आलेल्या नाहीत. पण १७, १८, १९ जुलै या तीन दिवसांत पाऊस पडला”, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
हेही वाचा >> इर्शाळवाडीत गेल्या १२ तासांत काय-काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला संपूर्ण घटनाक्रम
२२८ नागरिकांची वस्ती
ज्या गावात दरड कोसळली आहे तिथे चालत जावं लागतं, चालत जायला रस्ता नाही. एनडीआरएफच्या टीमलाही तिथे जाताना त्रास झाला. मंत्रिमहोदय तिथे आहेत. मुख्यमंत्री आहेत. यंत्रणा राबवण्याच्या ठिकाणी ते आहेत. विभागीय आयुक्त, उदय सामंत, दादा भुसे, आदिती तटकरे असे सगळे लोक तिथे आहेत. मात्र, हवामान खराब आहे. हेलिकॉप्टरही जाऊ शकत नाही. जेसीबी जायला जागा नाही. काहीच समजायला मार्ग नाही. २२८ लोक तिथे राहत होती. ४८ कुटुंब होती, असं अजित पवार म्हणाले.