मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. सध्या उपोषण स्थगित केलं असलं तरीही १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत आरक्षण दिलं नाही तर सरकारला जड जाईल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक दोन जिल्ह्यांत बोगस नोंदी झाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी हा प्रश्न समोर आला, असा आरोप केला जातोय. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “संविधानाच्या पदावर बसूनही छगन भुजबळांना कळत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वांना वेड्यात काढलं. मी हैदराबाद गॅझेट आणलंय. १८८४ ची जनगणना आहे. रेकॉर्डेड ओरिजिनल प्रिंट आहे. यात सर्व मराठा समाज कुणबी आहे. भूमि अभिलेख ३७ क्रमांकावर आहे. हे बोगस आहे का? तुम्हाला दिलेलं आरक्षणच सुरक्षित नाही.”

मराठा आरक्षणासाठी ओबीसी आणि धनगर समाजाकडून विरोध केला जातोय. या दोन्ही समाजाचे नेते मराठा आरक्षणाविरोधात एकत्र आले आहेत. यावरून मनोज जरांगे पाटलांनी या नेत्यांनाच आवाहन केलं आहे. “ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. ते बधिर झाले आहेत. त्यांना काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्याव्या लागणार आहेत. मोठं इंजेक्शन द्यावं लागणार आहे. सर्वांत जास्त ओबीसीचं वाटोळं त्यांनी केलंय. आपण दोघांनी (मराठा आणि धनगर ) शहाणं व्हायला पाहिजे. या संधीचं सोनं केलं पाहिजे. धनगर मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आले तर सत्ताच हस्तगत होऊ शकते. तुम्ही नाही दिलं तरीही आम्ही ओबीसी आरक्षणात जाणार आहोत. मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध झालंय. आमच्याकडे नोंदी आहेत. त्यापेक्षा डोकं लावा आणि सत्ताच हस्तगत करा.”

“एसटी आरक्षणाला एवढी ताकद लावली असती तर आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं. तरीही आम्ही तुम्हाला विरोधक मानलं नाही. मी एकाही नेत्याला दुखावलं नाही. आपण कांदा फोडून खाणारे लोक आहेत. त्यामुळे नेत्यांचं ऐकू नका. कदाचित एक दोन वर्षांनी धनगर बांधवांनी ठरवलं की एसटीत आरक्षण घ्यायचं, त्यांना मिळू शकतं. १३ तारखेच्या आत आरक्षण नाही दिलं तर इतकं जड जाईल की त्याच दिवशी कळेल”, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा >> “ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे सांगा”, पंकजा मुंडेंनी सरकारला विचारला जाब; म्हणाल्या, “मराठा आरक्षणाला…”

आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आहोत

चार आयोगांनी सांगितलं आहे, सुप्रिम कोर्टाने सांगितलं आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, असं छनग भुजबळ म्हणाले आहेत. असं विचारल्यावर, मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना राष्ट्रपतीच केलं पाहिजे. आयोगाचा आणि ओबीसी आरक्षणाचा काय संबंध? आयोगाने ५० टक्क्यांच्यावर आरक्षण नाकारलं आहे. परंतु, आम्ही आधीच ५० टक्क्यांच्या आरक्षणात आहोत.”

कितीही आडवे या, ओबीसीत जाऊन दाखवणारच

“ओबीसी आणि धनगरांना सांगणं आहे की यांच्या (छगन भुजबळांच्या) नादाला लागू नका. राजकीय उदय होण्याची क्षमता आहे. हे बाद झालेले केस आहेत. तुम्ही तुमचं करिअर यांच्या नादाला लागून खराब करून घेऊ नका. आम्ही ओबीसीत आलो तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग मराठ्यांची नाराजी का पत्करत आहात? एकसंघ राहा. तुमचं एसटीतील आरक्षण मिळेल. आतापर्यंत करोडो पोरांना आरक्षण मिळालं असतं. आमचं भांडण तुमच्याशी नाही, सरकारशी आहे. येवलावाल्या नाही पालथं केलं तर नाव सांगणार नाही. कितीही आडवे या, तरीही ओबीसीतच जाऊन दाखवणार”, असा सज्जड दमही त्यांनी भरला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal will have to be given bull pills after a few days big injection manoj jarang furry sgk