जुलै मध्ये आलेल्या महापुराला महिना लोटला तरी शासनाकडून तुटपुंजी मदत मिळालेली आहे.राज्य शासनाच्या या भूमिकेच्या विरोधात आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा आंदोलन सुरू केले आहे. याची सुरुवात बुधवारी सकाळी प्रयाग चिखली या तीर्थक्षेत्री त्यांनी अभिषेक घालून केली. येथून त्यांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये जुलै मध्ये महापूर आला. यामध्ये शेती,घरे, दुकाने यांची अतोनात हानी झाली. मात्र २०१९ सालच्या तुलनेत यावर्षी अत्यंत तोकडी मदत केली असल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. तेंव्हाप्रमाणे यावर्षी शासनाने मदत करावी, अशी मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचावर टीकास्त्र सोडले आहे.
महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. हे निकष बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती.
“राज्य सरकारने पूरग्रस्त मदतीचा निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार आहे. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे,” असा इशारा शेट्टी यांनी दिला होता.