Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. यामध्ये राज्यातील ३२ आमदार आणि विविध पक्षातील नेते उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात ठराव झाला आहे. मात्र, यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्यावर एकमत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावरून मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला असून अजून किती वेळ द्यायचा असा सवालही उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सरकारने आता वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. पण, आता सांगत आहेत की वेळ हवाय. कशासाठी आणि किती वेळ हवाय हे सरकारने सांगावं. मग मी समाजाशी बोलून वेळ द्यायचा की नाही ते ठरवेन”, असं मनोज जरांगे म्हणाले. तसंच, “आजच्या बैठकीतील तपशील पाहण्याची माझी इच्छा नाही. गोर गरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असातना हे नेते हसण्यावारी नेत आहेत. यांना जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं का?” असा सवालही जरांगेंनी विचारला.

हेही वाचा >> Breaking: मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक संपली, काय ठरलं? वाचा सविस्तर ठराव!

“आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठ्यांमध्ये दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येतंय तोवर चर्चेसाठी या. तुम्हाला किती वेळ हवाय ते सांगा. देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावं, रस्त्यांवर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील. पण आज संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे, मग बघू मराठ्यांना कसं आरक्षण देत नाहीत”, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.

हेही वाचा >> “आपण एका ताटात जेवलोय म्हणून सांगते…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सावधानतेचा इशारा; म्हणाल्या…

सरकारला कशासाठी आणि किती वेळ हवाय हे त्यांनी सांगावं, मराठ्यांना कसं आरक्षण देणार आहेत हे सांगावं, वेळ घेतल्यानंतर सरसकट आरक्षण देणार आहात का? हे सांगा, त्यानंतर आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू. नाहीतर पाच मिनिटांचाही वेळ देणार नाही. मग काय व्हायचंय ते पाहू, असंही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटलाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • आमच्या रक्तामासांत लढण्याची शक्ती आहे. त्यामुळे सरकारने बाजारचाळे करू नका, नेट सुरू करा. मराठे शांततेत आंदोलन करणार. ही लढाई आरपारची आहे. नेट बंद केल्याने आंदोलन थांबणार नाही.
  • आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.
  • सर्वपक्षीय बैठकीत सर्व नेते होते. कोणताच पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना समजलं.
  • सरकारला वेळ द्यायचा की नाही हे समाजाशी बोलून ठरवलं जाईल.
  • आज रात्रीपासून पाणी बंद
  • उद्रेकाला आमचं समर्थन नाही, आमचं आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fadnavis should come to the discussion the marathas will give protection jaranges open challenge after the all party meeting sgk