कराड : शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे, साहित्यिकांनी आपले लिखाण पुरस्कारासाठी नव्हेतर समाजाच्या हितासाठी करावे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित नवोदित साहित्य संमेलनात ‘कृषक समाज काल, आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजेपवार, शेतीमित्र अशोक थोरात, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश पाटील, संचालक नितीन ढापरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राजू शेट्टी म्हणाले, भारतीय संस्कृतीचा उदय शेतकऱ्यांपासून झाला. पण, राज्यकर्ते, शासकीय व्यवस्थेच्या भावना बोथटपणामुळे शेतकरी वर्षानुवर्षे अन्याय सहन करत आहे. भांडवलदाराने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम आजवर केले. स्वामिनाथन, सुब्रमण्यम यांनी देशात हरितक्रांती आणली. शेतकऱ्यांनी समृद्धी आणली. त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे चित्र योग्य पद्धतीने रंगवले नाही. गोरगरिबांचे शोषण करणारा, फेटा उडवणार शेतकरी अशा पद्धतीचे चित्रण मराठी साहित्यात व चित्रपटात रंगवले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली.

शरद जोशी म्हणायचे, सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहे. आसमानी संकटाचा सामना करत शेतकरी शेती करताना सरकार सुलतानी संकट त्यांच्यावर लादत आहे. शेतकरी आतबट्ट्यात येत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्यास त्या अनुषंगाने सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तसे कायदे करायला हवेत, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. डॉ. शरद गोरे, विठ्ठल राजेपवार यांनी आपले विचार माडले.

हमीभाव देण्याची सरकारची जबाबदारी

शेतमालाला रास्त हमीभाव मिळण्याची मागणी करताना, राजू शेट्टी म्हणाले, राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. शेतीमालाच्या दरावर नियंत्रण करण्याचा कायदा सरकारने केला असला, तरी शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव देण्याची जबाबदारीही सरकारची आहे. बाजारपेठेवर शेतकऱ्यांचे नियंत्रण नाही, तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध लादले जात आहेत. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. त्याची अंमलबजावणी सरकारने करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी या वेळी केली.