राजापुर – रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर, रत्नागिरी, लांजा, दापोली व गुहागर या तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिला आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून पडणा-या मुसळधार पावसामुळे राजापुर व रत्नागिरी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र पावसाने जिल्ह्यातील या पाच तालुक्यात आपला जोर कायम ठेवल्याने आता जिल्हा प्रशासन आणखीनच सतर्क झाले आहे.

जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून पावसाने येथील जनजीवन विस्कळीत केले आहे. रत्नागिरीसह राजापुर तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाचा जोर दापोली, गुहागर व लांजा तालुक्यांमध्ये देखील वाढल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत.

ढगफुटीसदृश झालेल्या मुसळधार पावसाने राजापूर तालुक्याच्या पश्चिम विभागात दाणादाण उडवून दिली असून या विभागातील घरे, रस्ते व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्या अनुषंगाने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव व तालुकाध्यक्ष मोहन घुमे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व तेथील ग्रामस्थांना संबधीत विभागा मार्फत तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. गुरव, तालुकाध्यक्ष श्री. घुमे यांच्या समवेत डाॅ.शेखर पाध्ये, प्रभुघाटे,मंदार सप्रे, प्रकाश गोडेकर, नाना कुवळेकर, हर्डीकर, भाजपा कार्यालय प्रमुख संदेश विचारे, संदिप तेरवणकर अदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील चोवीस तासात एकूण १०२७.२३ मिमी तर सरासरी ११४.१३ पाऊस मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच मंडणगड तालुक्यात १७७.५० मिमी, खेड ९५.०० मिमी, दापोली १३८.८५ मिमी, चिपळूण ८८.०० मिमी, गुहागर १४०.०० मिमी, संगमेश्वर ६४.०० मिमी, रत्नागिरी १२३.३३ मिमी, लांजा ११८.८० मिमी तसेच राजापूर मध्ये ८१.७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.