धाराशिव : मराठा आरक्षणासाठी मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळू लागले आहे. बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने जिल्हाभरातील व्यापार्‍यांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळत आंदोलनाला समर्थन दिले. उमरगा येथे कर्नाटकातील बस जाळण्याचा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील सर्व आगारांनी मंगळवारी प्रवासी सेवा बंद ठेवली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाभरातील जवळपास पावणे चारशे गावांमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला विविध समाजसंघटना, पक्ष पदाधिकारी पाठींबा देत आहेत. मात्र मागील दोन दिवसांपासून बीड व धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाज शासनाच्या भूमिकेवर हिंसक भूमिका घेत आपला संताप व्यक्त करीत आहे. बीड जिल्ह्यात घरे, गाड्या आणि सार्वजनिक बस जाळण्याचे प्रकार घडल्यानंतर सोमवारी रात्री तुळजापूर ते सोलापूर महामार्गावरील माळुंब्रा येथे रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. तर उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे रात्री ३० ते ४० जणांच्या जमावाने कर्नाटकातून पुणे येथे जाणार्‍या भालकी-पुणे बसला अडवून चालक व वाहकासह प्रवाशांना खाली उतरविले आणि बसच्याच डिझेलने बसला आग लावली.

हेही वाचा : “बाप रुग्णालयात असताना पोरगा लंडनमध्ये…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणे, “बाळासाहेबांना होडीत सोडून…!”

यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस पूर्णपणे जळाली आहे. या घटनेची उमरगा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. धाराशिव रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या शिंगोली येथील रेल्वे रूळावर विविध संघटनांनी निदर्शने करीत सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करत आरक्षणासाठी घोषणाबाजी करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv karnataka bus set on fire by maratha protesters curfew imposed in the district css