सध्या देशाला गांधीवादामुळे प्रचंड वेदना होत आहेत असं वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथे राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेल्या गणपती मंडळाच्या देखाव्याचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पुढे बोलताना त्यांनी “आपल्याला यातून सुटका करुन घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे,” असंही सांगितलं आहे.

पुण्यातील भाजपा नगरसेवक धीरज घाटे यांच्या साने गुरुजी तरुण मंडळाने यावेळी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. मंडपात प्रवेश करताच भव्यदिव्य प्रवेशद्वार साकारण्यात आलं असून प्रभू रामाची मूर्तीही ठेवण्यात आली. यासाठी एकूण १५ लाखांचा खर्च करण्यात आला. संपूर्ण देखावा भगवामय करण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांनी मंडळाला भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “जेव्हा गरज लागते तेव्हाच देव हाती शस्त्र घेतात. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला त्या स्वरुपात दिसतो. संत तुकाराम यांनी एकदा आपण सर्वांना विठ्ठलाचे भक्त झालं पाहिजे असं म्हटलं होतं. पण सध्याच्या काळात आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे”.

“ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला भूतबाधा होते त्याप्रमाणे सध्या देश गांधीवादातून जात आहे. आपण सर्वांनी गणेशोत्सवाची परंपरा जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,” असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मंडळाचे अध्यक्ष असणारे धीरज घाटे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. “अयोध्येत राम मंदिर पाहणं आमचं स्वप्न आहे. यामुळेच आम्ही त्याची प्रतिकृती उभारली आहे. येथे येणाऱ्या भक्तांना आमचा दृष्टीकोन लक्षात येईल आणि प्रभावित होतील अशी अपेक्षा आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.