महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री मंगळवारी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. मात्र हा दौरा आता रद्द झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस म्हणाले, “या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या संदर्भात कर्नाटकही निर्णय घेऊ शकत नाही आणि महाराष्ट्रही निर्णय घेऊ शकत नाही. सगळा जो काही निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयच या संदर्भात घेणार आहे. मला असं वाटतं की विनाकारण या संदर्भात नव्याने कुठलातरी वाद निर्माण करणे, हेदेखील योग्य होणार नाही. महाराष्ट्राने अतिशय ताकदीने आपली बाजू मांडलेली आहे. आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की आपल्याला सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल.”

हेही वाचा – “बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”; मंत्री शंभूराज देसाईंचं विधान!

याचबरोबर, “मंत्र्यांचा दौरा जो काही होता, हा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त होता आणि एका कार्यक्रमासाठी मंत्री तिथे जाणार होते. या संदर्भात कर्नाटकचे काही म्हणणं आहे, महाराष्ट्राचही काही म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखूही शकत नाही. परंतु महापरिनिर्वाणदिनी आपण अशाप्रकारचा वाद तयार करायचा का? हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणून यासंदर्भात काहीना काही विचार आम्ही करतो आहोत, मुख्यमंत्री या संदर्भातील अंतिम निर्णय आम्हाला देतील. पण प्राथमिक मत आमचं असं आहे, की महापरिनिर्वाणदिन हा आपल्यासाठी फार मोठा दिवस आहे आणि त्या दिवशी एखादं आंदोलन व्हावं, एखादी चुकीची घटना घडावी हे योग्य नाही.” असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – “आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना किमान…”; शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर!

याशिवाय, “आपल्याला भविष्यातही त्या ठिकाणी जाता येईल. जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कोणीही घाबरतदेखील नाही. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतंत्र भारताच्या कोणत्याही भागात कोणीही कोणाला थांबवू शकत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मात्र महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्या दिवशी काय करावं यासंदर्भात चर्चा सुरू आहे, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra karnataka border dispute if the ministers decide no one can stop them from going devendra fadnavis msr