Maharashtra Board Class 10 Result 2025 Updates: शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल. महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल ९४.१० टक्के इतका लागल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

किती विद्यार्थी बसले होते SSC परीक्षेला?

यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा एकूण २८ हजार ५१२ खासदी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

या परीक्षेला राज्यातल्या ९ विभागीय मंडळातील नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ८७ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्वांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे.

मुलीच ठरल्या सरस, कोकणाची पुन्हा बाजी!

सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.

विभागनिहाय SSC निकाल… (सर्वाधिक ते सर्वात कमी क्रमाने)

कोकण विभाग – ९८.८२ टक्के
कोल्हापूर विभाग – ९७.४५ टक्के
मुंबई विभाग – ९५.८४ टक्के
पुणे विभाग – ९४.८१ टक्के
नाशिक विभाग – ९३.०४ टक्के
अमरावती विभाग – ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ९२.८२ टक्के
लातूर विभाग – ९२.७७ टक्के
नागपूर – ९०.७८ टक्के

गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णांची टक्केवारी घटली

राज्यात २३ हजार ४८९ माध्यमिक शाळांपैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागलेला आहे. मार्च २०२२ चा निकाल ९६.९४ टक्के होता. मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के होता. मार्च २४ चा निकाल ९५.८१ टक्के होता. या वर्षीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्यांनी कमी झाली आहेत.

प्रथम-द्वितीय-उत्तीर्ण श्रेणीची टक्केवारी

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

१ लाख ८ हजार ७८१ विद्यार्थी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

इथे तपासा तुमचा निकाल

३७ परीक्षा केंद्रांची मान्यता गैरप्रकारांमुळे होणार रद्द!

ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडले, त्यांची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ३७ केंद्रांवर गैरप्रकार घडले होते. त्यांची मान्यता चौकशीअंती कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल.