वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये अखेर फूट पडली असून एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान वंचितने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. “इम्तियाज जलील यांच्या बोलण्याला अर्थ नाही. ओवेसी यांनी जाहीर केल्यानंतर आपण यावर भाष्य करणार असल्याचं,” वंचितकडून सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

दलित-मुस्लीम ऐक्य घडल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात असे सांगत लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विशेष सभा घेतली होती. या सभेनंतर एमआयएने कधीही आक्रमक भूमिका घेतली नाही. उलट प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहेत, ते जे सांगतील तसेच होईल, असे एमआयएमचे नेते सांगत होते.

खासदार म्हणून निवडून आलेल्या जलील यांनीदेखील आम्ही दिलेली जागांची यादी अंतिम नाही. आम्ही याबाबत लवचिक भूमिका घेत आहोत, असे वारंवार स्पष्ट केले होते. मात्र, दिल्या जाणाऱ्या जागा आणि दोन वेळा बैठका होऊनही ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील चर्चेचा भाग अजून स्पष्ट झाला नव्हता. ५ सप्टेंबपर्यंत वाट पाहा, असे ओवेसी यांनी कळविले होते, एवढेच खासदार जलील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २४ जागा लढविल्या होत्या. त्यापेक्षा अधिक जागा मिळाव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या बोलणीला फारसे यश येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडेच प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मुस्लीम तरुणांची स्वतंत्र बैठक घेतली होती. तत्पूर्वी एमआयएमने मागितलेल्या जागांबाबत आपण खूश नाही, असा संदेश देणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतून एमआयएमला बाजूला सारले जाण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim vanchit bahujan aghadi asaduddin owaisi prakash ambedkar imtiyaz jaleel sgy