गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. हा महामार्ग पूर्ण होऊन कोकणवासियांना सुलभ प्रवास करता यावा याकरता आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आंदोलन कसं झालं पाहिजे, यावर मार्गदर्शन केलं. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “चांद्रयानाचा आपल्याला काय उपयोग?” मुंबई-गोवा महामार्गावरून राज ठाकरेंचा मिश्कील टोमणा, म्हणाले…

“रस्ते आस्थापनाच्या अध्यक्षांसह अनेक लोक आहेत, पण पक्ष म्हणून तुम्हाला यात उतरावं लागेल. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत सर्वांना उतरावं लागेल. जिथे गरज असेल तिथे एकमेकांना सहकार्य करावं लागेल. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाहीय, हे लक्षात ठेवा. पण आंदोलन अशा प्रकारचं झालं पाहिजे की सरकराकडून तत्काळ पावलं उचलली गेली पाहिजेत. आणि लोकांना चांगला, उत्तम रस्ता मिळाला पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.

कोकणाचं रुपडं घाण करून टाकतील

“माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना माझ सांगणं आहे संपूर्ण कोकणावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. कोण जमिनी पळवतोय. आज जसं बाकीच्या ठिकाणी सुरू झालंय की लोक हिंदी बोलायला लागले आहेत. सर्व कोकणाचं रुपडं घाण करून टाकतील”, असं सतापही राज ठाकरेंनी व्यक्त केला.

हेही वाचा >> “जे खोके खोके ओरडत होते त्यांच्याकडे कंटनेर्स आहेत, त्यांनी तर करोना…”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

“कोकणात उद्योग आलेच पाहिजेत. पण कोकणाचं सौंदर्य राखून आलं पाहिजे. असा प्रदेश सहसा मिळत नाही, परमेश्वासची कृपा मिळाली आहे, महाराष्ट्रावर. ती कृपा जपावी”, असंही राज ठाकरे म्हणाले.

आंदोलनाची भीती निर्माण झाली पाहिजे

“असं आंदोलन करा की यापुढे रस्ते करताना कोणालाही अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं अशी भीती असावी, दहशत असावी. मी तुमच्यासोबत आहेच आहे, जिथे माझी गरज लागेल, तिथे तुम्ही मला हक्काने बोलवा”, अशी सादही राज ठाकरेंनी यावेळी घातली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns calls for agitation for mumbai goa highway raj thackeray said raise such a movement that sgk