अजित पवार यांनी त्यांच्याविषयी होणाऱ्या विविध चर्चांनंतर पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार कसं आलं? तसंच भाजपा कसं पहिल्या दिवसापासून मविआ सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता अजित पवारांनी या मुलाखतीत टोलेबाजी केली आहे. ‘सकाळ’ च्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले अजित पवार?

“महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल हा अचानक घडलेला नव्हता. अनेकदा इथं काही जण मी नावं घेत नाही पण ते साक्षीदार पण एकनाथ शिंदेबाबत कानावर यायचं. ते नाराज झाले होते. त्यांच्या मनात काही वेगळं शिजत होतं हे आम्हाला समजत होतं. आम्ही हे शरद पवारांना सांगितलं. आम्ही हे उद्धव ठाकरेंना सांगितलं. उद्धवजी म्हणायचे की ठीक आहे मी त्यांच्याशी बोलतो. पवारसाहेबही त्यांच्याशी बोलले. एखाद्याच्या मनात जर वेगळं काही चाललं असेल आणि तुम्ही त्याला विचारलं की काय रे काही गडबड आहे का तर तो म्हणणार आहे का? की माझ्या मनात गडबड आहे? ते म्हणणारच ना गावाकडे आलो आहे, शेती करतोय असंच एकनाथ शिंदे सांगायचे.

देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टोला

उद्धव ठाकरेंचं सरकार आल्या दिवसापासून जवळपास आत्ता जे सरकार महाराष्ट्रात आलं आहे त्या सरकारमधला एक महत्त्वाचा पक्ष भाजपा आहे. हे सरकार बाजूला जावं म्हणून पहिल्या दिवसापासून भाजपाचा प्रयत्न सुरू होता. हा प्रयत्न करत असताना एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की माझे मिस्टर अनेकदा वेशभूषा बदलून रात्रीचे बाहेर जायचे. त्या धर्मपत्नीलाही माहित नव्हतं की चांगल्या कामासाठी जात आहेत की इतर कुठल्या कामाला जात आहेत. कारण वेशभूषा रात्री बदलून बायकोला घरी ठेवून पुरुष बाहेर पडतो त्यात दोन-तीन अर्थ निघू शकतात. मात्र नंतर समजलं की हे कशासाठी बाहेर जात होते. त्यांच्यातल्याच काही सहकाऱ्यांनी सांगितलं की एकनाथराव शिंदे आणि संबंधित व्यक्ती भेटी घेत होते. हे त्यांच्याच सहकाऱ्यांनी सांगितलं असं म्हणत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

आम्ही उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवार यांच्या कानावर अनेक गोष्टी सांगत होतो. विश्वासाने उद्धव ठाकरेंनी कोणते अधिकारी असावेत हे ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंना दिला होता. एकनाथ शिंदे हे जेव्हा २० जूनला बाहेर पडले तेव्हा त्यांनीच आणून बसवलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षितपणे सुरतला पोहचवलं. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्या कार मातोश्रीवर वळवा. पण एकनाथ शिंदेंना ते अधिकारी लॉयल राहिले आणि सगळं नाट्य घडवलं गेलं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader ajit pawar taunts devendra fadnavis about government topple in 2022 what did he say scj