विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारी दिलेल्या नावांवरून बराच वाद उभा राहिला. निष्ठावंतांना डावलून भाजपानं उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. मात्र यावरून भाजपातील वातावरण तापलं होतं. मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय नितीन गडकरी यांनी मौन सोडलं आहे. गडकरी यांनी खडसे यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली.

विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे इच्छुक होते. तशी इच्छा त्यांनी पक्षाकडे बोलून दाखवली होती. त्याचबरोबर विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर पाठवलं जाईल, असंही बोललं जात होतं. मात्र, भाजपानं सगळ्यांनाच धक्का दिला. उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर खडसे यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडलं होतं. राज्यातील नेत्यांमुळे तिकीट मिळालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावरून बराच कलगीतुरा एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्यात रंगला होता. या सगळ्या वादावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा- एकनाथ खडसे भडकले!, तिकीट नको म्हणून माझी मुलगी ढसाढसा रडत होती, का दिलं?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले,”गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र काम केलं आहे. पक्षाचा विस्तार करण्यात खडसे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अतिशय प्रतिकूल काळात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात त्यांनी मोठं काम केलं. पक्षाला यश मिळवून दिलं. मात्र आज त्यांना दिली जाणारी वागणूक दुःखद आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून इतकी वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर वा नेत्यावर ही वेळ येणं पक्षासाठी चांगलं नाही. त्याबद्दल मी फक्त दुःख व्यक्त करू शकतो, त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही,” अशा शब्दात गडकरी यांनी आपली खंत व्यक्त केली.