देशात एकीकडे करोनाच संसर्ग वाढलेला असताना दुसरीकडे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्वाचा आहे. कारण, आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक निकालामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. या ठिकाणी भाजपाचे समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत झाल्याचे दिसून आले. यामध्ये भाजपाने बाजी मारल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण, समाधान आवताडे यांनी ४ हजारांपेक्षा अधिक मतांनी घेतलेली विजयी आघाडी कायम ठेवली असून, मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “पंढरपूर पोट निवडणुकीमधे महाविकास आघाडीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले..तरीही लोकानी नाकारले..महाविकासआघाडी मधल्या आमदारांना हा संदेश आहे..येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका.. भाजपा हा एकच पर्याय आहे..महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!” असं नितेश राणे ट्विटद्वारे म्हणाले आहेत. पंढरपुर पोट निवडणुकीमधे MVA मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले.. तरीही लोकानी नाकारले.. MVA मधल्या आमदारांना हा संदेश आहे.. येणारा धोका समजा आणि.. एक पाउल पुढे टाका.. भा ज प हा एकच पर्याय आहे.. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!! — nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2021 या अगोदर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “साम, दाम, दंड, भेद, सगळं करूनही पंढरपूरात महाविकासआघाडीला जनतेने नाकारलं” ''महाविकास आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच'' असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.