अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राजकीय पक्षांना महापालिका-पालिका निवडणुकाआधी होणार की जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या, याचबरोबर प्रभाग रचना व प्रभाग आरक्षणाचे वेध लागलेले आहेत. पूर्वतयारीसाठी चाचपण्या सुरू झाल्या आहेत, बैठकाही होत आहेत. सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून निधीची मागणी होऊ लागली आहे तर विरोधी पक्षांकडून नागरी प्रश्नांवर आंदोलने वाढू लागली आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील भाजप नगरसेवकांची भेट घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना करत प्रभागातील विकास कामांसाठी निधीही देऊ असे सांगितले. पक्षाची तिरंगा यात्रा तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून निवडणुकीची पुर्वतयारी सुरू केली आहे.

शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना केल्याची माहिती दिली. मात्र निवडणूक स्वबळावर की महायुतीमार्फत हे स्पष्ट केले, नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी मनपा निवडणुकीसाठी पक्ष महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाण्यास तयार असल्याची माहिती दिली. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आल्याचा उपयोग निवडणुकीसाठी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, शनिवारी मुंबईत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत स्थानिक पातळीवरील निवडणुकीची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्ष बांधणीसाठी जिल्ह्यात दौरे सुरू केले आहेत. जिथे पदे रिक्त आहेत तेथे नियुक्त्या करण्यास सुरुवात केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी दिली.

शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाची मुंबईत बैठक होऊन महायुतीमार्फत शक्य झाले नाहीतर स्वबळावर स्थानिक निवडणुका लढवण्याचे सूचना वरीष्ठांनी केल्याची माहिती दिली. लवकरच शहरातील इच्छुकांची बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रभागातून पक्षाकडे सक्षम उमेदवार नाहीत तेथे उमेदवारांचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) दि. २७ व २८ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, विधानसभेचे आजी- माजी सदस्य यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे व प्रशासक काळातील लोकप्रतिनिधींचे अपयश, नागरी प्रश्न घेऊन आम्ही लोकांमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यूहरचनेला सुरुवात

महापालिकेची आगामी प्रभाग रचना व आरक्षण कसे असेल याचा अंदाज घेत आत्तापासूनच प्रभागात कोणाकोणाला समवेत घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे याची व्यूहराचना राजकीय पक्षातील इच्छुकांनी सुरू केली आहे. त्यादृष्टीने पक्षप्रवेशही घडत आहेत. प्रामुख्याने ठाकरे गटातून बाहेर पडणारे व शिंदे गट, भाजपमध्ये याच दृष्टीने प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य पातळीवर महायुती होते की महाविकास आघाडी राहते याकडे लक्ष ठेवत स्थानिक पातळीवर स्वबळही जपण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सध्याचे संख्याबळ

सध्या महापालिकेत एकूण १७ प्रभाग आहेत. त्यामध्ये प्रत्येकी चार नगरसेवक याप्रमाणे ६८ नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आले होते. त्यामध्ये एकत्रित शिवसेनेचे २३, एकत्रित राष्ट्रवादीचे १९, भाजपचे १५, बहुजन समाज पक्षाचे ४ व अपक्ष १ होते. गेल्या दीड वर्षांपासून मनपामध्ये प्रशासक राज सुरू आहे.