महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलं आहे. या पत्रात जनतेचा पोलीस दलावरचा विश्वास कमी झाला आहे अशी कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोळीबाराच्या घटना मागच्या सात दिवसात तीनदा घडल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे पत्र चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे रश्मी शुक्लांनी पत्रात?

प्रिय नागरिकांनो,
मी राज्य पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारुन एक महिना झाला आहे. हे औचित्य साधत राज्याच्या सर्व पोलिसांच्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि या अल्प कालावधीत मिळालेली शिकवण आणि पुढील वाटचालीच्या दृष्टीने माझे ध्येय मी शेअर करते.

महाराष्ट्र पोलीस दलातील समर्पित स्त्री पुरुषांच्या बरोबरीने पुन्हा एकदा सेवा आणि संरक्षण करण्याच्या या विशेषाधिकाराबद्दल मी आधीच आभार व्यक्त करते. मी आत्तापर्यंत जे पाहिले आहे, अनुभवले आहे त्यावरुन मला खात्री आहे की महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणं अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील.

केंद्रीय पोलीस दलाचे नेतृत्व करताना मिळालेले अनमोल अनुभव गाठिशी घेऊन मी राज्यात परतले आहे. राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक आणि उच्च दर्जाच्या वागणुकीचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आम्ही पोलीस आणि जनता यांच्यातील पूल पुन्हा बांधू, पोलीस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकार कृत्ये आमच्याकडून खपवून घेतली जाणार नाहीत. जर राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्रास होत असेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून न्याय मिळू शकत नसेल तर ही गोष्ट पोलीस महासंचालक कार्यालयात आमच्या निदर्शनास आणून देण्याची मी विनंती करते. माझे सहकारी आणि मी तुम्हाला लवकरात लवकर मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु.

हे पण वाचा- विश्लेषण : रश्मी शुक्ला अखेर पोलीस महासंचालक… पण त्यांची नियुक्ती इतकी चर्चेत कशासाठी?

आमचे पोलीस दल सुरक्षितता आणि परिणामकारकतेने त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी आवश्यक संसाधने आणि प्रशिक्षणाने सुसज्ज आहेत याची खात्री करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. डीजीपी या नात्याने आमच्या सेवेत दररोज आपला जीव घालणाऱ्या धाडसी पोलिसांना मी सर्वतोपरी पाठिंबा देईन.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. . राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक, आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmi shukla general of police has written a letter to the people of the state through social media scj