गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नाराजीच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. परंतु, हे पेल्यातलं वादळ असून, लवकरच संपेल, बुलढाण्यात दोन पदाधिकाऱ्यांमधला तो वाद असून लवकरच मिटेल, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं होतं. त्यावर रविकांत तुपकरांनीही लगेच प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, माझा कोणाशीही वाद नाही. नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि भूमिकेवर माझा आक्षेप आहे. त्यामुळे स्वाभिमानीत राजू शेट्टी विरुद्ध रविकांत तुपकर असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, तुपकर यांनी सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वावर टीका केली आहे. त्यामुळे आज संघटनेने शिस्तपालन समितीची बैठक बोलावली आहे. ही समिती तुपकरांवर कारवाई करू शकते, किंवा तुपकरांची संघटनेतून हकालपट्टी करू शकते असं बोललं जात आहे. अशातच तुपकरांचे जुने सहकारी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रविकांत तुपकर यांना सल्ला दिला आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, “रविकांत तुपकर त्याचे निर्णय घ्यायला सक्षम आहे. मी त्याला सांगेन, देशात सध्या सरसरळ ध्रुवीकरण सुरू आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांविरोधात आघाडी तयार होत आहे. इंडिया असं या आघाडीचं नाव आहे. आमचा लढा इंडिया विरुद्ध भारत असा आहे. भारत वाचवायचा असेल, गावखेडा, गावगाडा वाचवायचा असेल तर रविकांत तुपकरने इंडियाच्या बाजूने उभं राहू नये. भारताच्या बाजूने उभं राहावं.” सदाभाऊ खोत टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> Video: लोकसभेत पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न, म्हणाले…

रविकांत तुपकर यांचं कौतुक करत सदाभाऊ खोत म्हणाले, रविकांत हा विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे, तो शरद जोशींच्या विचाराने प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे. मी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष झालो, तेव्हा शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीतला हा युवक पाहिला. हा चुणचणीत तरुण असून याला आपण पुढे आणलं पाहिजे असं मला वाटलं. मग मी रविकांतला बरोबर घेऊन राज्यभर दौरे केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून मला बाहेर काढल्यावर काही वर्षांनी रविकांत माझ्याकडे आला. परंतु, नंतर तो परत गेला. कारण त्याचा पिंड चळवळीतला आहे. त्याला वाटलं सत्तेत राहिलो तर आपण गावखेड्यातल्या शेतकऱ्यांपासून दुरावले जाऊ. सत्तेत असल्यावर आपल्याला लोकांच्या प्रश्नांवर बोलता येईल का? तो परत संघटनेत गेला तेव्हा मला वाईट वाटलं. परंतु, आत्ता ज्या पद्धतीने त्याचं खच्चीकरण होतंय, ते पाहून वाईट वाटतं. असा कार्यकर्ता घडायला २० ते ४० वर्ष लागतात. पण त्याची माती करायला २० सेकंद लागतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadabhau khot says ravikant tupkar should not go with opposition india allience asc