माजी खासदार संभाजीराज छत्रपती सध्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागत दौरा करत आहेत. मंगळवारी (१८ ऑक्टोबर) संभाजीराजे नाशिकमध्ये आले असताना त्यांना पत्रकारांनी राजकारणात येणार का? निवडणूक लढणार का? असे प्रश्न विचारले. यावर संभाजीराजेंनी उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. “लोकांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. मात्र, राजकारणापलिकडे अनेक गोष्टी आहेत,” असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजीराजे भोसले म्हणाले, “आज मला त्यावर भाष्य करता येणार नाही. लोकांची इच्छा, अपेक्षा आहे हे निश्चित आहे. राज्यात अनेक वर्षांपासून केवळ राजकारणावर लक्ष दिलं जातं. मात्र, राजकारणापलिकडेही अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्र महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. इथं अनेक संत, साहित्यिक होऊन गेले. सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख आहे. हे सगळं आता पुसलं जात आहे.”

“महाराष्ट्रात आज केवळ असंस्कृतपणा सुरू आहे”

“आज शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, ज्ञानोबा महाराज यांच्याविषयी चर्चा होत नाही. महाराष्ट्रात आज काय चाललं आहे याची चर्चा बाहेरचे लोक करत आहेत. केवळ असंस्कृतपणा आहे. आपण केवळ शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव घेतो. मात्र, आपण खरंच तो विचार घेऊन पुढे चाललो आहे का? हा प्रश्न माझ्यासह सर्वांना आहे. त्यामुळे आत्मचिंतनही करणं गरजेचं आहे,” असं संभाजीराजेंनी सांगितलं.

हेही वाचा : ‘मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे,’ मराठा क्रांती मोर्चाच्या ‘त्या’ भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींचे वक्तव्य; म्हणाले “राजवाडा, घरदार सोडून…”

“राजकारणात पूर्वीपासून पोकळी आहे. मात्र, पोकळी असणं आणि राजकारणात येणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वराज संघटना हा सामाजिक मंच आहे. त्यामुळे गावागावात संघटनेच्या शाखा सुरू करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पिंजून काढला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati reaction on will he join politics to contest election pbs