Sanjay Raut remark on Supriya Sule Maharashtra Political Update : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. सत्तेची तहान लागली असली तरी कोणी गटारातलं पाणी प्यायचं नसतं असा सल्ला राऊत यांनी खासदार सुळे यांना दिला आहे. शरद पवारांच्या पक्षातील काही नेते भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये रंगत आहे. त्यावर राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली. तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की नवी पिढी भाजपाबरोबर जाणार नाही.

खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की “शिवसेनेची नवी पिढी भाजपाने फोडली”. त्यावरून त्यांना विचारण्यात आलं की अलीकडेच चर्चा रंगू लागली आहे की शरद पवारांची नवी पिढी भाजपाबरोबर जाण्यास व्याकूळ असल्याचं बोललं जात आहे, महायुतीमधील अजित पवारांचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपा या नव्या पिढीला जवळ घेऊ शकते का? शरद पवारांची नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का? त्यावर राऊत म्हणाले, “मला तसं वाटत नाही. मात्र, तुम्ही माध्यमं वारंवार सुप्रिया सुळे यांचं नाव घेताय. कदाचित त्यांना सत्तेची तहान लागली असेल”.

खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “तुम्ही प्रसारमाध्यमं सुप्रिया सुळे यांचं व अन्य काही नेत्यांची नावं घेत आहात. त्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं किंवा गढूळ पाणी पित नाही. त्यांना सगळ्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. परंतु, नेमक्या कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायची म्हटलं तरी लाटांचा सामना करावा लागणार आहे. महासागरात इतक्या मोठ्या लाटा उसळल्या आहेत, तिथे बरीच गर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. तिकडे आधी गेलेले लोक आपल्या अस्तित्वासाठी धडपड करत आहेत. त्यात आता नवीन लोक तिथे जाऊन काय करणार आहेत?”

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे राहुल गांधी व काँग्रेसच्या नेत्यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोंडीत सापडले आहेत. दुसऱ्या बाजूला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील नेते महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगत आहे.