छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन गटात राडा झाला आहे. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर परिसरातील किराडपुरा भागातील राममंदिराजवळ दोन गटात वाद झाला. काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनांसह इतर खासगी गाड्यांना आग लावली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या राड्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरमधील दंगल ही पूर्वनियोजित होती. या राड्यातील काही युवकांना हैदराबादहून आणलं होतं, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं. ते औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संबंधित राड्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “काल छत्रपती संभाजीनगर शहरात जी दंगल झाली, ती दंगल पूर्वनियोजित होती. हे मी ठामपणे सांगतोय. कारण सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर लक्षात येईल की, काही युवकांचं टोळकं पोलिसांच्या गाड्या पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळे तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात. अवघ्या १० मिनिटांत हे सगळं कसं काय घडलं? त्यामुळे हा दंगा पूर्वनियोजित म्हणता येईल.”

हेही वाचा- छत्रपती संभाजीनगरसह कोलकत्यात हिंसाचार: संजय राऊतांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळ्या दंगली…”

“दरम्यान, खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, या हल्ल्यामागे ‘बटन गँग’ आहे. ‘बटन गँग’ म्हणजे नशेच्या गोळ्या खाणारी गँग. पण ती ‘बटन गँग’ होती, याची माहिती खासदारांना कशी काय माहीत होती? मग ती ‘बटन गँग’ कोण आहे? कुठली आहे? याचा खुलासा खासदारांनी केला पाहिजे. म्हणून ही दंगल घडवणारे आणि दंगल घडवून आणणारे कोण आहेत? याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे,” अशी मागणी शिरसाट यांनी केली.

हेही वाचा- VIDEO: पश्चिम बंगालमध्ये रामनवमी सणाला गालबोट, अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी

शिरसाट पुढे म्हणाले, “ही घटना छोटी नाहीये. या शहरात दलित, मुस्लीम आणि हिंदू अशा सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. शहरात जे चांगलं पोषक वातावरण आहे, ते बिघडवण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. त्यातील बहुतेक युवक हैदराबादचे आहेत, अशी माझी माहिती आहे. म्हणून याला अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे. ही कुठल्या एका समाजाविरोधातील घटना नाही. ही या शहराच्या विरोधात झालेली घटना आहे, याचा त्रास संपूर्ण शहराला होतोय. संबंधित युवक हैदराबादचे होते, अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण एकाचवेळी ४००-५०० तरुण तोंडावर रुमाल बांधून कसं काय येऊ शकतात? तेही रात्रीच्या वेळी… ही घटना दिवसा घडली असतं तर समजू शकलो असतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat reaction on chhatrapati sambhajinagar violence on ramnavmi hyderabad connection rno news rmm