पंतप्रधान मोदी छातीवर मूठ मारून जे सांगतात की, ‘‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं.’’ हे काही खरे नाही. विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही, असा हल्लाबोल शिवसेनेने मोदी सरकारवर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आपण एकटेच सर्व विरोधकांना कसे भारी पडलो आहोत हे पंतप्रधान मोदी यांनी भर संसदेत छातीवर मूठ आपटून सांगितले. वेगळ्या भाषेत त्यास ‘छाती पिटणे’ असेही म्हटले जाते. असे छाती पिटून बोलणे पंतप्रधानपदास शोभत नाही. हाती पोलीस, न्यायालय, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज ठेवून ‘‘मी एकटाच लढत आहे व सगळ्यांना भारी पडत आहे’’ असे सांगणे मजेशीर आहे व ही मजा फक्त मोदीच करू शकतात. अशी मजा आपल्या देशात गेली सात-आठ वर्षे सुरूच आहे,” असा टोला शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

हेही वाचा : “हेच मी केलं असतं तर…”, पंतप्रधानांच्या ‘त्या’ कार्यक्रमातील उपस्थितीवरून उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल!

“राज्यपालांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील भाजप व त्यांचे मिंधे सरकार उभे राहिले याची…”

“महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून त्यांनी ‘मविआ’ सरकारविरुद्ध अनेक बेकायदेशीर कृत्ये करून घेतली. ‘मविआ’ सरकार असताना कोश्यारी यांनी बहुमतातील सरकारच्या शिफारसींना केराची टोपली दाखवली. १२ नामनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नियुक्त्या होऊ दिल्या नाहीत. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सावित्रीबाई फुलेंपर्यंत महाराष्ट्राच्या अभिमानावर ऊठसूट चिखलफेक करीत राहिले ते वेगळेच. या अशा राज्यपालांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील भाजप व त्यांचे मिंधे सरकार उभे राहिले याची नोंद इतिहासात राहील,” अशी टीका राज्यातील सरकारवर शिवसेनेने केली आहे.

हेही वाचा : भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवाजी महाराजांचा अपमान करणारं…”

“रमेश बैस यांचे स्वागत करताना थोडा कोळसा…”

“महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही. राज्यघटनेची व तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचे स्वागत करताना थोडा कोळसा उगाळावा लागला. कारण चंदन उगाळण्याचे दिवस संपवले गेले आहेत,” असेही शिवसेनेने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena attacks pm narendra modi mai akela hu comment and bhagatsingh koshyari ssa