सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘ एक भारत-श्रेष्ठ भारत ‘ उपक्रमांतर्गत मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमोर पश्चिम बंगालच्या लोकगीतांचा नृत्याविष्कार सादर केला. हा नृत्याविष्कार पाहून राज्यपाल भारावून गेले.

पश्चिम बंगाल राज्य स्थापनादिनाचे औचित्य साधून या सांस्कृतिक कार्यक्रमात बंगालच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते. सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांनी कलाकृती सादर केल्या. ‘ एलो दुर्गा मां ‘ हे लोकगीत, रवींद्रनाथ टागोरांच्या दृष्टीतून पश्चिम बंगाल हे एकपात्री सादरीकरण, रैबेनशे लोकनृत्य आणि मुलींचे झुमर नृत्य सादर करण्यात आले.

सहज सुंदर घडविण्यात आलेल्या लोक सांस्कृतिक कलाविष्काराने राज्यपाल राधाकृष्णन प्रभावित झाल्याचे कुलगुरू प्रा. महानवर यांनी सांगितले.