सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळी सणानंतर लगेचच देवदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवाचे नगारे वाजू लागतात. त्रिपुरारी पौर्णिमे दरम्यान या जत्रोत्सवांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या उत्सवांमुळे जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल होते. विविध प्रकारची दुकाने थाटली जातात आणि नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात असलेले चाकरमानी या काळात आवर्जून गावी परततात. यामुळे कोकण रेल्वे देखील हाऊसफुल्ल गर्दीने खचाखच भरून धावते. सोनुर्ली येथील श्री देवी माऊली, मालवण मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी माता, देवगड येथील श्री देव कुणकेश्वर अशा विविध देवदेवतांच्या जत्रोत्सवासाठी शेकडो भाविक येत असतात.
सोनूर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव ६ नोव्हेंबरला:
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावच्या श्री देवी सोनूर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. जत्रोत्सवाची तयारी सुरू झाली असून, देवस्थान समितीच्या पदाधिकारी व गावकर मंडळींनी याबद्दल माहिती दिली आहे.
‘लोटांगण जत्रोत्सव’ म्हणून विशेष ओळख:
श्री देवी सोनूर्ली माऊलीचा हा वार्षिक उत्सव ‘लोटांगण जत्रोत्सव’ म्हणून विशेषत्वाने ओळखला जातो. हे जागृत देवस्थान नवसाला पावणारे दैवत म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यांतूनच नव्हे, तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक या दिवशी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी सोनूर्ली येथे गर्दी करतात.
अनेक भक्तगण आपल्या मनोकामना आणि नवस पूर्ण झाल्यावर श्री देवी मंदिरात पुरुष झोपून तर महिला उभे राहून लोटांगण घालतात. ही अनोखी भक्तीची परंपरा या जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. हजारो भाविक लोटांगण घालून आपला नवस फेडतात, ज्यामुळे त्यांच्या श्रद्धेचे आणि देवीवरील विश्वासाचे दर्शन घडते.
कार्तिक पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी सोहळा
दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) दुसऱ्या दिवशी हा भव्य सोहळा पार पडतो. यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या जत्रोत्सवात सहभागी होऊन श्री देवी सोनूर्ली माऊलीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
लाखो भक्तांच्या गर्दीने आणि लोटांगणाच्या भक्तीमय वातावरणाने सोनूर्ली गाव या दिवशी भारावून जातो. प्रशासनाने आणि देवस्थान समितीने उत्सवासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था आणि नियोजन योग्य प्रकारे सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात होणारी व्यापारी उलाढाल आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी अनेक दुकाने थाटली जातात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते.