परभणी:जिल्ह्यात विविध बँका आणि पतसंस्थांमध्ये कोणीही दावा न केलेल्या तब्बल २८ कोटी रुपयांच्या ठेवी असून या ठेवी ज्यांच्या आहेत त्यांनी त्या परत मिळवाव्यात म्हणून एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध बँकामधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित खातेदारानी या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील विविध बँका, पतसंस्थेत एकूण २८ कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. या ठेवी १ लाख २३ हजार ४५७ खात्यांमध्ये असून संबंधित खातेदारांना त्यांच्या हक्काच्या रकमा परत मिळवून देण्यासाठी एक विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम जिल्हा अग्रणी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, परभणी यांच्या पुढाकाराने व सर्व सदस्य बँकाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र आकुलवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध बँकांमध्ये एकूण ५ हजार ८६६ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. त्यापैकी वैयक्तिक खात्यांतील रूपये ४ हजार ६१२ कोटी, संस्थात्मक खात्यांतील रूपये १ हजार ८२ कोटी, आणि सरकारी योजनांतील रूपये १७२कोटी रुपयांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, सलग १० वर्षे निष्क्रिय असलेल्या खात्यांमधील ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरुकता निधी’ मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, संबंधित ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचा परतावा घेण्याचा पूर्ण हक्क आहे.ठेवी परत मिळवण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, खात्याची माहिती आणि अद्यावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे.

या मोहिमेअंतर्गत सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे, ग्राहक भेटी आणि माहिती सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व खातेदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपले हक्काचे पैसे परत मिळवावेत, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र आकुलवार यांनी केले आहे.