Sudhir Tambe On Balasaheb Thorat : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर आज मतदारसंघात कार्यकर्त्याचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना माजी आमदार सुधीर तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबद्दल भाष्य करताना एक मोठं विधान केलं. “साहेबांचं (बाळासाहेब थोरात) काय चुकलं? मला वाटतं की ते भाजपामध्ये गेले असते तर मंत्री झाले असते”, असं सुधीर तांबे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे.

सुधीर तांबे काय म्हणाले?

“राज्यात ज्या-ज्या भागाचं नेतृत्व मोठे नेते करतात तेथे देखील पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. मात्र, संगमनेरमध्ये आपण पाण्याचा प्रश्न सोडवला. निळवंडे धरणातून पाणी आपण या ठिकाणी आणलं. जे-जे मंत्रालय बाळासाहेब थोरात यांनी सांभाळलं, आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो तर आम्हाला लोक सांगतात. आता नांदगावला गेलं तर लोक सांगतात की आमचं एक धरणाचं काम वर्षांनुवर्ष अडलं होतं. ते काम त्यांनी केलं. तेच निफाडमध्येही लोक असंच सांगतात. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा सर्व लोक चांगलं सांगतात”, असं सुधीर तांबे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी; मनसेचं खळखट्याक!

“बाळासाहेब थोरात यांनी जे-जे मंत्रालय सांभाळलं ते सक्षमपणे सांभाळलं. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मात्र, या निवडणुकीत झालेला पराभव नाही तर घात आहे. कारण चुकीचा प्रचार, चुकीच्या बातम्या पेरायच्या, खोटे व्हिडीओ व्हायरल करायचे? अरे तुम्ही (विरोधक) समाजाला कुठे घेऊन चाललात?एवढा द्वेष का निर्माण करायचा? तसेच मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. त्यामुळे या सर्वांचा परिणाम हा झाला. आता काही अदृश्य शक्तीबाबतही लोक चिंता करत आहेत”, असं म्हणत सुधीर तांबे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

“आज तुम्ही पाहिलं की मारकडवाडीतील लोकांनी ठरवलं की त्या ठिकाणी बॅलेटपेपरवर मतदान घ्यायचं. आता मतदान झालं होतं. मग गावातील लोकांनी ठरवलं होतं. मात्र, त्या गावाची जेवढी लोकसंख्या आहे त्या पेक्षा जास्त पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. त्या ठिकाणी लोकांना दम दिला जातोय की जर तुम्ही अशा प्रकारे बॅलेटपेपरवर मतमोजणी केली तर तुमच्यावर कारवाई करू. अशा प्रकारच्या गोष्टी राज्यात सुरु आहेत. धर्माधर्मात वाद निर्माण होतील अशा प्रकारचे वाद उभा केले जात आहेत”, असा हल्लाबोल सुधीर तांबे यांनी विरोधकांवर केला.

‘भाजपामध्ये गेले असते तर मंत्री झाले असते’

“आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे. मग जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपण विकसित भारत घडवणार आहोत का? आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही अशा प्रकारे न्याय देणार आहात का? तरुणांची स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत का? अशा प्रकारचं राजकारण या देशात सुरु आहे. आता साहेबांचं (बाळासाहेब थोरात) काय चुकलं? मला वाटतं की ते भाजपामध्ये गेले असते तर मंत्री झाले असते. मात्र, आपल्याला आवडलं असतं का? जे काही राजकारणातील पावित्र्य आणि जे काही तत्व आहेत, ते तत्व जपून ते काम करत आहेत”, असंही सुधीर तांबे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir tambe on balasaheb thorat in sangamner vidhan sabha 2024 politics bjp vs congress gkt