दीड महिन्यापासून वसई-विरार शहरात हजारो कामगार अडकले 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : टाळेबंदीमुळे वसई-विरारमधील विविध भागांत हजारो नाका कामगार अडकले आहेत. ना घर, ना गाव, ना काम अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली असून आता आर्थिकदृष्टय़ा त्यांची परवड होऊ लागली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून  ते विविध अडचणींचा सामना करत आहेत.

मागील  दीड महिन्यापासून बांधकाम व्यवसाय पूर्णत: ठप्प आहे. टाळेबंदीच्या अगोदर मोलमजुरी करून कमावलेले पैसे आता जवळजवळ संपत आले आहेत. नाका कामगार हे रोजंदारीने काम करत असल्याने त्यांना कोणी वाली नाही. काही ठिकाणी कंत्राटदार मदत करत होते, पण व्यवसायच बंद असल्याने तेही हतबल आहेत. अनेक नाका कामगार हे जोडप्याने असल्याने ते बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहात होते. पण आता तिथे पाण्यासापासून सर्वच समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे तिथे राहाणे शक्य नाही. टाळेबंदीमुळे गावी जाता येत नसल्याने अनेक जणांनी पायी जात आपले गाव गाठले आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार विरार चंदनसार येथे मूळ जळगाव जिल्ह्यातील ८३ कुटुंबे अडकली आहेत. विरार जीवदानी पाडा येथील झोपडपट्टी परिसरात ६५हून कुटुंबे ही अकोला, बीड, धुळे, लातूर या परिसरातील आहेत. तर नालासोपारा धानीव बाग, तेपाचा पाडा, रामनगर, येथे १००हून अधिक कुटुंबे ही जळगाव, सातारा, अमरावती, जालना, बीड  परभणी या परिसरांतून आहेत. असाच प्रकारे तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी हजारो कुटुंबे अडकली आहेत. त्यांना खाण्यापिण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत

आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिधापत्रिका असूनही त्यांची नावे जिल्ह्यात नसल्याने त्यांना धान्य मिळत नाही, तर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे निदान सरकारने आमच्या गावी जाण्याची सोय तरी करावी अशी मागणी आता हे कामगार करत आहेत.

आमचे कोणी येथे वाली नाही दीड महिन्यापासून काम बंद आहे, ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कुटुंबीयांसह राहतो. आता कशासाठीच पैसे नाहीत, रोज रांगेत उभे राहून खिचडी घेऊन पोट भरत आहोत. आम्हाला आमच्या गावी पाठवा.

– राजेश राठोड

लहान मुले आणि महिलांचे मोठे हाल आहेत, येथे दवाखान्यातसुद्धा आम्हाला घेत नाहीत, रेशनकार्ड आहे पण येथे नाव नसल्याने कुणी राशन देत नाही. आम्हाला कुणी जेवले की नाही हे विचारायला सुद्धा येत नाहीत. पिण्यासाठीसुद्धा पाणी नाही.

– किसान पवार, चाळीसगाव 

आमच्यातील अनेक लोक चालत गावी गेले आहेत, पण आमच्याबरोबर परिवार असल्याने जाऊ  शकलो नाही, पण जर सरकारने आमची कोणतीही दाखल घेतली नाही तर आम्हाला उपासमारीने मरावे लागेल.

– भगवान शिलगे, जळगाव

मागील काही दिवसांपासून डहाणू, तलासरी येथील अडककेल्या सात हजार  खलाशांना उतरवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन दिवसरात्र काम करत आहोत. स्थानिक मच्छीमारांनी खलाशांना अन्नधान्य तसेच मदत पुरवली आहे. शेवटची खलाशांची बोट येईपर्यंत आम्ही प्रशासनाशी वाटाघाटी करून खलाशांना सुखरूप घरापर्यंत पोचवणार आहोत.

– विनोद निकोले, आमदार,  डहाणू 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of workers have been stranded in vasai virar due to lockdown zws