नांदेड : मराठवाड्यात पावसाचा आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक असला, तरी विदर्भात चांगलाच जोर आहे. पैनगंगेच्या लाभक्षेत्रात नियमित व दमदार पाऊस सुरू असल्याने सहस्रकुंड (ता. किनवट) येथील नयनरम्य धबधबा सहस्रधारांनी कोसळतो आहे. पर्यटक विशेषतः तरुणाईची येथे मोठी गर्दी होते आहे. रील्स बनवणाऱ्यांनी मात्र सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असल्याचे दिसून आले.
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड हे नैसर्गिक धबधब्याचे ठिकाण अतिशय नयनरम्य, मनोहर आहे. पैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात तयार झालेला हा धबधबा सहस्रधारांनी कोसळतो, हे फेसाळणारे दृश्य नजरेत साठवावे तेवढे कमीच. शासनाची उदासीनता आणि दळणवळणाच्या साधनांची कमतरता यामुळे हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय पुरक ठिकाण विकासापासून वंचित राहिले. गरम पाण्याचे झरे म्हणून प्रसिद्ध असलेले उनकेश्वर आणि देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ रेणुकामातेचे माहूर ही दोन्ही प्रसिद्ध ठिकाणे सहस्रकुंड येथून नजीकच आहेत.
उन्हाळ्याचे दिवस वगळता शालेय व कौटुंबिक सहलीसाठी अतिशय उत्तम ठिकाण म्हणून सहस्रकुंड नावारुपाला येते आहे. नांदेडपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेले सहस्रकुंड, विदर्भातील उमरखेड (जि.यवतमाळ) तालुक्यापासून मात्र जवळ आहे. सहस्रकुंड हे नांदेड-किनवट रेल्वे मार्गावरील स्थानकाचे ठिकाण. रस्ते मार्गे नांदेड-किनवट मार्गावर हिमायतनगरपासून अवघ्या ३२ किलोमीटर अंतरावर आहे.
पर्यटनस्थळ म्हणून सहस्रकुंड येथे खूप संधी आहेत. बुलडाणा जिल्ह्यात उगम पावणारी पैनगंगा नदी पुढे जावून वर्धा नदीला मिळते. या नदीचे पात्र नांदेड जिल्ह्यात प्रवेश करताना अतिशय विस्तीर्ण झाले आहे. या विस्तीर्ण अशा पात्रातच सहस्रकुंड नामक नैसर्गिकरीत्या तयार झालेला धबधबा खूपच मोहक आहे. सुमारे ४० फूट उंचीवरून फेसाळत कोसळणाऱ्या शेकडो धारा आणि त्यामुळे उडणारे थंडगार तुषार अंगावर घेणे हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. धबधब्याचा एकसुरी आवाज कर्णमधुर भासतो.
फुलपाखरांचे उद्यान
या धबधब्याजवळच एक सुंदर बगीचा विकसीत करण्यात आला आहे. फुलपाखरांचे उद्यान म्हणून त्याची ओळख अलीकडे गडद होऊ लागली आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा दूरवरून जिथे धबधब्याचे विलोभनीय दृश्य नजरेत साठविण्याची सुरक्षित व्यवस्था केली आहे, बागेतून धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यात रंगीबेरंगी फुलपाखरं थेट बालपणात आणि बालकवींच्या निसर्ग कवितांच्या विश्वात घेऊन जातात.
पावसाळी सहलीसाठी योग्य
दोन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये सहस्रकुंड येथे पावसाळी सहल काढणे अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. महाराष्ट्र, विदर्भासह येथून जेमतेम १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.