शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केल्यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील प्रक्षोभक भाषणाचा मुद्दा चर्चेत आहे. असं असतानाच आता सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एक विनंती केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सामंत यांना या हल्ल्याचा आदित्य यांच्या भाषणाशी काही संबंध जोडता येईल या अशा अर्थाचा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांना एक विनंती केली.

नक्की वाचा >> “विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे…”; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कात्रज चौकामध्ये झालेल्या या दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सामंत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सामंत यांना थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.

नक्की वाचा >> Photos: आपल्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी पाहून शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणतात, “मी शिवसेनेत प्रवेश…”

“ज्या नेत्याची सभा होती त्याने काठ्या देण्याची भाषा केलेली. एकीकडे हुकूमशाही म्हणायचं आणि दुसरीकडे हे असं. जर काही अघटीत घडलं असतं तर माझ्या आई वडिलांची प्रतिक्रिया घ्यावी लागली असती की मुलाबद्दल काय वाटतं. मीच शहाणा, मीच मोठा, माझ्या मतदारसंघात मी सांगेन तेच होईल वगैरे असं चालणार नाही. ही अशी विचारसणी नाशवंत आहे,” असं सामंत यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं. यावरुनच त्यांना, “एका नेत्याची सभा असा तुम्ही उल्लेख करत आहात तर तुमचा थेट रोख आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. सामंत यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, “त्यांना आव्हान देण्याऐवढा मी मोठा नाही,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> “ईडीच्या भीतीनेच शिंदे भाजपासोबत”; शिवसेनेचा हल्लाबोल, म्हणाले, “भाजपाने शिंदेंच्या मदतीने शिवसेना संपवण्याचा डाव टाकला पण…”

“राजकीय लढाई ही विचाराची असावी. वाईट विचाराला चांगल्या विचाराने उत्तर द्यावे. एखाद्याने ५ इंचांची विकासाची लाइन मारली तर त्याला १० इंची विकासाच्या विचाराने उत्तर द्या,” असंही सामंत यांनी म्हटलं. तसेच आदित्य आणि उद्धव यांचा थेट उल्लेख करत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन, “कोणाचं काही भाषण झालं मी थेट बोललो नाही. हिंगोलीतील एका पदाधिकाऱ्यानेही चिथावणी देणारं भाषण केलं होतं. काल माझ्यावर हल्ला झाल्यावर जे तुरुंगात जाणार त्यांच्या मागे कोण उभं राहणार? त्यांची कुटुंब काय करणार?” असा प्रश्न सामंत यांनी विचारला.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

“मारहाण करणं ही काय शिवसेना स्टाइल आहे? आपला विचार लोकशाही मार्गाने माडणं महत्त्वाचं असतं. सेना स्टाइल म्हणजे काय तर मला मारणार. आणि दुसरीकडे मग नारायण राणेंना शिव्या घालणार. दाखवायचे आणि खायचे दात वेगळे हे कालपासून कळलं,” असंही सामंत म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण…

विचारांची लढाई विचारांनी लढावी यासाठी नेत्यांनीच पुढाकर घेण्याची गरज असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. “यामध्ये नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. नेते असं का सांगत नाही की, ४० लोक आपल्यापासून दूर गेले आता मारामारीऐवजी आपण लोकांपर्यंत पोहचू. लोकांना पटवून देऊ की ही दूर गेलेली लोक वाईट आहेत. हे लोकांपर्यंत पोहचवू असं नेते कार्यकर्त्यांना का सांगताना दिसत नाहीत?” असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant car attack eknath shinde supporter mla answers question about aditya uddhav thackeray connection scsg