ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला त्यामुळे मी हे म्हणू शकतो की मेरा और पुणे का पुराना रिश्ता है. असं म्हणत पत्रकार परिषदेत हसत हसत उद्धव ठाकरेंनी टोला मोदींना लगावला. पुण्याला वेगळी परंपरा आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. आता मुंबई काय आणि पुणे काय सर्व माहेर घरं बिल्डरांची झाली आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे पत्रकार विचारु शकतात का?
“आपण टिळक आणि आगरकर यांचा उल्लेख करतो. पण त्यांच्याकडून काय घेतलं. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का. हे विचारण्याची ताकद आहे का आपल्यात. अभूतपूर्व दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कात तळं झालं होतं. त्याही चिखलात शिवसैनिक होता. वयोवृद्ध आले होते. स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. आपल्याकडे बिर्याणीची सोय नाही. पाऊस पडत असतानाही सर्व आले होते. तिथे काही दरवाजे नाही. त्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज वाटली नाही. इतरांना वाटली असेल. भाषणं सुरू झाल्यावर दरवाजे बंद करतात“ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सौगात ए नेहरु किंवा सौगात ए इंदिरा ऐकलं आहे का?
“ढोंगाला लाथ मारणं हे आमचं काम आहे. आमच्या अंगावर हे लोकं येतात. तुम्ही हिंदुत्व सोडलं का म्हणता. मग तुम्ही काय काय सोडलं तुमची वंशावळ बघा. जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो. कडवट हिंदुत्ववादी होतो. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं का? माझा मोहन भागवतांवर आक्षेप नाही. संघाला १०० वर्ष पूर्ण झाली. संघाच्या पिढ्यांनी ज्या खस्ता घातल्या. त्या कष्टाला आज विषारी फळं लागली हे १०० वर्षाचं फलित आहे का? भागवत मशिदीत जातात. सौगात ए मोदी वाटत आहे. तुम्ही सौगात ए नेहरू, सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकलं का? सौगात ए मोदीवाले हिंदुत्ववादी कसे? पाकिस्तानसोबत संबंध ठेवू नका हे शिवसेनाप्रमुख म्हणायचे. तेच आम्ही सांगितलं. पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, असं तुम्ही सांगता, मग तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
भाजपाने केलं तर अमरप्रेम, आम्ही केलं तर लव्ह जिहाद?
“आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम सौगात ए मोदी वाटत आहेत, ३२ लाख लोकांना सौगात ए मोदी वाटतात. तरीही ते हिंदुत्ववादी. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद. असं कसं होऊ शकतं? भाजपने सौगात ए मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे” अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी केली.