सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोह कायद्याच्या फेरविचार याचिकेवर महत्वाचा निर्णय दिला आहे. या कायद्यासंदर्भात फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयाने राजद्रोहाचं कलम तात्पुरतं स्थगित केलं आहे. यावरील फेरविचार पूर्ण होईपर्यंत या कलमाअंतर्गत कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ नये असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यानंतर आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या निर्णयाबाबत भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्यांविरोधात राजद्रोहाचे कलम इंग्रजांनी लावले होते. आपल्या हिंदू संस्कृतीवर आलेले संकट, साडेसाती आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात  वाढलेली आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहे. अशा परिस्थितीतून हनुमान चालिसा वाचून त्यातून मुक्तता मिळाली पाहिजे या उद्देशाने आम्ही पाऊल उचलेले होते. त्यावरुन आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्हामध्ये १४ दिवस कारागृहामध्ये ठेवले. या कायद्याला स्थगिती दिल्याने सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो. खऱ्या अर्थाने इंग्रजांचा कायदा मोडून काढण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी काम केले आहे. उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचे पालन हनुमान चालिसा वाचणाऱ्यांच्या विरोधात करत असतील तर हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने आज आम्हाला न्याय आणि देशाला दिलासा दिला आहे. त्याबद्दल मोदी सरकारचे आभार मानतो,” असे आमदार रवी राणा म्हणाले.

“२३ मे रोजी खासदार नवनीत राणा यांचा जबाब लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे नोंदवण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी एका महिला खासदाराच्या घरी पोलीस पाठवून त्यांना १४ दिवस कोठडीत ठेवले. याबाबत नवनीत राणा आपले मत मांडणार आहेत,” असेही रवी राणा म्हणाले.

“मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आमच्या फ्लॅटला नोटीस दिली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्र्यांच्या कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी मुंबईत आहेत. पण आमच्या जवळ आमच्या मेहनीतीचा एकच फ्लॅट आहे. फ्लॅट विकत घेतल्यानंतर १५ वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन आम्हाला नोटीस देण्यात आली आहे. याविरोधात लढण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणूक उतरू,” असे आमदार राणा म्हणाले.

“उद्धव ठाकरेंची १४ मे रोजी सभा आहे. त्यात ते मर्दासारखं काम करतो वगैरे बोलतील. पण त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात टाकून नामर्दपणाचं काम केले आहे. याला मर्दपणा म्हणत नाही. हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांच्या विरोधात राजद्रोहाचं कलम लावलं जातं. हे पाहून बाळासाहेबांना खूप दुःख होत असेल, बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी सुलेमान सेना करुन टाकली आहे,” असे रवी राणा म्हणाले.

१४ मे रोजी नवी दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती

“ज्या दिवशी शिवसेनेची सभा आहे, त्याच दिवशी म्हणजेच १४ मे रोजी नऊ वाजता नवी दिल्लीत प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण आणि महाआरती करणार आहे,” असे रवी राणा म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray is following the law of the british criticism of ravi rana abn