शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. राऊतांना अटक झालेली असताना आता उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी तसेच भाजपावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्याबद्दल मला अभिमान आहे. ते शरण जाऊ शकले असते पण गेले नाहीत. सध्याचे राजकारण घृणास्पद झालेले आहे. निर्घृणपणे वागू नका. काळ तुमच्यासोबतही निर्घृणपणाने वागू शकेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राऊतांच्या घरातील नोटांवर मुख्यमंत्री शिंदेचं नाव असल्यावरुन प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या हसत म्हणाले, “मी…”

“संजय राऊत यांच्याबद्दल मला अभिमान आहे. ते माझे जुने मित्र आहेत. आताच मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आलो. त्यांनी काय गुन्हा केला आहे. ते पत्रकार आहेत. निर्भीड आहेत. जे पटत नाही, त्यावर ते बोलतात. मरण आलं तरी पर्वा नाही पण मी शरण जाणार नाही, असे राऊत म्हणतात. त्यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. तेही शरण जाऊ शकले असते. जे तिकडे शरण गेले आहेत ते हमाममध्ये अंघोळीला गेले आहेत. जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्याभोवती आहे, तोपर्यंत ते आमच्यावर टीका करू शकतात. जेव्हा सत्तेचा फेस निघून जाईन तेव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव होईल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>संजय राऊतांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हे सर्व जगजाहीर की…”

“विरोधात कोणी बोलला तर त्याला अडकवायचं असं सुरु आहे. बऱ्या बोलाने शरण आले तर ठीक, नाहीतर कारवाई केली जात आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्याचीलच एका स्तंभाला आता अटक झाली आहे. राजकारणाची घृणा वाटायला लागली आहे. राजकारणात दिलदारपणा पाहिजे. इतर पक्ष संपवण्याची हौस असेल तर जनतेसमोर जायला हवे. तुमचे विचार मांडा. विरोधक त्यांचे विचार मांडतील. नंतर जनतेला निर्णय घेता येईल,” असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >> ‘जरा तो भोंगा नीट करा’, एकनाथ शिंदेंची सूचना अन् त्यानंतर राऊतांना टोला, म्हणाले “आता आवाज येणारच…”

“मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. पण मुंख्यमंत्रिपदाची हवा मी डोक्यात जाऊ दिली नाही. मी नम्र राहण्याचा प्रयत्न करत राहिलो आहे. ज्यांच्या डोक्यात हवा गेली, आहे त्यांना मला सांगायचंय की निर्घृणपणे वागू नका. दिवस आणि काळ हा सर्वासांठी नेहमी चांगलाच असतो असे नाही. भविष्यात काळ तुमच्यासोबतही निर्घृणपणाने वागू शकेल,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray said proud of sanjay raut after ed arrests criticize bjp and eknath shinde group prd