Vineet Kumar Singh safely returns to Mumbai : बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवणारा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे विनीत कुमार सिंह. विनीत १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटात झळकला होता. यातील त्याच्या कामाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्याने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मित्राची कवी कलश यांची भूमिका साकारली होती.

‘छावा’ चित्रपटामुळे विनीत कुमार सिंह खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. यानंतर त्याने त्याच्या चाहत्यांना अजून एक आनंदाची बातमी दिली. ते म्हणजे तो लवकरच बाबा होणार आहे. यामुळे तो बरेच दिवस चर्चेत होता. अशातच विनीत आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतु, यामागचं कारण वेगळं आहे. विनीत नुकताच दुबईला गेला होता. यावेळी त्याने विमानाने प्रवास करताना त्याचा अनुभव सांगितला होता. या दरम्यान त्याचा प्रवास खूप तणावपूर्ण असल्याचे त्याने म्हटलं आहे.

विनीतने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत, “मी सध्या दुबई विमानतळावर असून फ्लाईटची वाट बघत आहे. सुदैवाने सगळं सुरळीत होईल” असं म्हटलं होतं. यानंतर तो मायदेशी परतला. भारतात आल्यानंतर त्याने पुन्हा सोशल मीडियामार्फत तो सुखरुप परतला असल्याचं सांगितलं होतं. विनीतने ‘न्यूज १८’शी संवाद साधताना सांगितलं की, “आम्हाला रात्री १० वाजेपर्यंत काय होणार आहे याबाबत माहीत नव्हतं. पण, नंतर समजलं की बोर्डिंग सुरू झालं आहे. फ्लाईटला उशीर झाला होता, पण पुढे सगळं व्यवस्थित पार पडलं.”

विनीतने ‘हिंदुस्थान टाईम्स’शी संवाद साधतानाही याबाबत सांगितलं. तो म्हणाला, “मला जेव्हा अचानक फोन आणि मेसेज यायला लागले तेव्हा मी विमानतळावर होतो. चौकशी केल्यानंतर कळलं की यूएईची विमानसेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे ९:४० च्या फ्लाईटला उशीर झाला आणि तेव्हा मला समजलं होतं की काहीतरी सुरू आहे. पण, तेथील स्टाफने आम्हा सर्वांशी नीट संपर्क साधत परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि नंतर आम्ही १०:४५ ची फ्लाईट पकडली.”

विनीत पुढे म्हणाला, “माझी बायको गरोदर आहे, त्यामुळे घरूनही फोन सुरू होते. कारण त्यांना काळजी वाटत होती आणि तेव्हा विमानतळावर युद्धाबद्दल चर्चा सुरू झालेल्या. आपण ज्या बातम्या बघतो त्या खऱ्या असतीलंच असं नाही. मी अशा परिस्थितीत नेहमीच शांत राहणं योग्य समजतो आणि जेव्हा मी भारतात परतलो, तेव्हा मला पाहताच माझं संपूर्ण कुटुंब आनंदी होतं.” विनीत कुमार सिंह नुकताच दुबईला गेला होता. यावेळी मिडल ईस्टमध्ये विमान सेवा बंद करण्याची घोषणा झाली होती. परंतु, नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तो सुखरुप भारतात परतला. याबाबत त्याने सोशल मीडियावरून सांगितलं होतं.

दरम्यान, विनीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो एक हरहुन्नरी अभिनेता आहे. ‘छावा’ चित्रपटातील त्याच्या कामाने त्याने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. त्याने ‘छावा’, ‘जाट’, ‘सुपर बॉईज ऑफ मालेगाव’, ‘मुक्काबाझ’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयासह तो एक लेखकसद्धा आहे.