अभिनेत्री पल्लवी जोशी या कायमच परखडपणे त्यांची मतं मांडत असतात. पल्लवी जोशी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या मुरलेल्या कलाकारांपैकी एक आहेत. अभिनयाप्रती त्यांचं प्रेम, शिस्त, नवीन काहीतरी करण्याची धडपड या सगळ्या गोष्टी त्यांना इतरांपासून वेगळं बनवतात. तर अभिनयाच्या बाबतीत त्या फार चोखंदळ असून त्या निवडक भूमिका साकारताना दिसतात.

पल्लवी जोशी यांनी नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना “तू मालिका बघतेस का” असा प्रश्न विचारला गेला. पल्लवी जोशी या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाल्या, “मी टेलिव्हिजनच एकंदरीत बघत नाही, आमच्या घरामध्ये फार टीव्ही पाहिला जात नाही.” यानंतर त्यांना “तू स्वत: मालिका केल्या आहेत. आता तुला सीरियल कराव्याशा वाटत नाही का?” असं विचारलं गेलं. यावर त्यांनी, “नाही, मालिका सुरू झाल्यापासून मी नाहीच केलं काही फक्त ‘पेशवा बाजीराव’ नावाची एक मालिका केली होती. पण, नाही झेपत रोजचं. कारण अभिनेत्री म्हटलं की काहीतरी नवीन करत राहण्याची सवय आहे. इथे तुम्ही एकच भूमिका तीन-चार वर्ष जर केलीत, तर जे आहे आतमध्ये ते सगळं एकाच मालिकेत निघून जातं.”

“मग काहीही केलं तरी आरशासमोर उभं राहून रियाझ करताना स्वत:कडे पाहिलं की असंच वाटतं की, अरे हे केलं आहे आधी आणि त्यामुळे मालिका आता कराव्याशा वाटत नाही आणि कोणत्याही कथानकाला शेवट नसेल तर मग तुमची भूमिका काय त्यात, तुम्हाला सांगताच येत नाही.” पुढे त्यांना ‘मालिकेची निर्मिती करावीशी पण नाही वाटत का” असं विचारण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या, ‘नाही, कारण मी मराठीत दोन मालिका केल्या होत्या; त्यात निदान कथा होती. मालिका असल्याने थोडी वाढवली गेली, पण सुरुवात, मध्य आणि शेवट ठरलेला होता ‘असंभव’ (‘झी मराठी’वर लागायची) मालिकेचा तरी. ‘अनुबंध’ (‘झी मराठी’वरील मालिका) थोडी ऑफट्रेक गेली, त्याच्यामुळे त्याचा घाईघाईत शेवट करावा लागला. पण, आता मला असं वाटतं की ते सुद्धा खूप जास्त आहे, एवढं ताणलं नाही पाहिजे.”

पल्लवी यांनी ‘ग्रहण’ मालिकेबद्दलही सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “ग्रहण’ एपिसोडिक मालिका होती, १०० भागांचीच होती, त्यामुळे ती मालिका करताना आम्हाला त्रास झाला नाही.” यामध्ये त्यांना ओटीटीबद्दलही विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी “ओटीटी मुलं म्हणत आहेत, करायचं आहे; त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.” पुढे त्यांनी मराठीमध्येही चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.