बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांची आज ९२ वी जयंती. किशोर कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये सर्व भाषांमधील जवळपास १५०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. किशोर कुमार हे त्या गायकांपैकी एक होते ज्यांनी संगीत शिकण्यासाठी कधी क्लासेस नाही लावले. त्यांनी १९४६ मध्ये ‘शिकारी’ चित्रपटातून डेब्यू केलं होतं.
किशोर कुमार यांचं खरं नाव आभास गांगुली असं होतं. त्यांना म्युझिक डायरेक्टर एस.डी. बर्मन यांनी त्यांच्या करिअरमध्ये मोठा ब्रेक दिला होता. एका माध्यमाशी बोलताना किशोर कुमार यांनी सांगितलं होतं की त्यांचा भाऊ अशोक कुमार यांच्यामार्फत एस.डी. बर्मन यांना भेटले होते. अशोक कुमार म्हणाले होते, “माझा भाऊ थोडं फार गात असतो. त्यांच्या सांगण्यावरून मी एस.डी. बर्मन यांच्यासमोर त्यांचंच एक बंगाली गाणं ऐकवलं होतं. माझं गाणं ऐकून सचिन दा म्हणाले की, तू मला कॉपी करतोय. मी नक्कीच तुला गाण्याची संधी देणार.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहानपणी खूपच बेसुरे होते किशोर कुमार

किशोर कुमार यांचे भाऊ अशोक कुमारने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, किशोर कुमार लहानपणी खूपच बेसुरे होते. त्यांचा आवाज एखाद्या फाटक्या बासुरी सारखा होता. एकदा किशोर कुमार किचनमध्ये आईजवळ गेले. त्यांचा पाय भाजी कापायच्या इळतीवर पडला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचं बोट कापलं. किशोर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार केले. डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे किशोर तेव्हा खूप रडु लागले होते. बहुतेक रडल्यामुळेच त्यांचा आवाज साफ झाला होता.”

 

मधुबालासाठी स्वीकारला इस्लाम

किशोर कुमार यांचे चार विवाह झाले आहेत. त्यांची पहिली पत्नी रूमा गुहा होती. पण लग्नाच्या आठ वर्षातच दोघांचा १९५८ मध्ये घटस्फोट झाला. याचं कारण होतं मधुबाला. विवाहीत असलेले किशोर कुमार मधुबालाच्या प्रेमात पडले होते. ज्यावेळी किशोर कुमार यांनी मधुबालासमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यावेळी मधुबाला स्वतःच्या उपचारासाठी विदेशी जात होत्या. मधुबालाने किशोर कुमार यांच्या प्रेमाला स्वीकार केला आणि अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकले. किशोर कुमार यांचं हे दूसरं लग्न होतं. मधुबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांचं नाव बदलून अब्दुल करीम असं केलं होतं.

 

पण किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या नात्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी भरपूर विरोध केला. अखेरपर्यंत त्या दोघांच्या स्वीकार त्यांच्या दोन्ही कुटुंबीयांनी केला नाही. किशोर कुमार यांचं मधुबालासोबत दुसरं लग्न सुद्धा फार काही काळ टिकलं नाही. ह्दयात छिद्र असल्याकारणाने मधुबालाचं निधन झालं आणि किशोर कुमार पुन्हा एकदा एकटे पडले.

मधुबाला यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली आल्या. दोघे सुरूवातील प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न केलं. १९७६ मध्ये किशोर कुमार यांनी तिसरं लग्न केलं. लग्नाला काही वर्षच झाले तर दोघांचे खटके उडायला सुरूवात झाली. अखेर १९७८ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर योगिता बाली यांनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं.

योगिता बाली यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात लीना चंदावरकर आल्या. १९८० मध्ये किशोर कुमार यांनी चौथं आणि शेवटचं लग्न केलं. त्यांना एक मुलगा सुमित कुमार सुद्धा झाला. लीना आणि किशोर कुमार यांच्यामध्ये जवळपास २१ वर्षाचं अंतर होतं. किशोर कुमार यांचं हे एकच लग्न असं होतं जे शेटवपर्यंत टिकून राहीलं.

किशोर कुमार हे त्यांच्या विचित्र वागण्यामुळे सुद्धा चर्चेत होते. त्यांनी आपल्या घरासमोर ‘किशोर कुमार पसून सावधान’ असा बोर्ड लावला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishore kumar birthday when legendary singer converted to islam for marrying madhubala unknown and interesting facts prp